वाळपई ः सत्तरी तालुक्यातील अनेक ग्रामीण भाग आजही मोबाईल नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहेत. या परिस्थितीत सुधारणा घडवण्यासाठी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी पुढाकार घेतला असून, झर्मे, दाबे, हिवरे, गोळावली आणि वांते या गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या टॉवरद्वारे नेटवर्क सेवा सुरू होणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांना मोबाईल आणि इंटरनेटच्या सुविधेचा लाभ मिळणार असून, शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवन सुलभ होणार आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट सुविधा मूलभूत गरज बनली आहे. मात्र, सत्तरीतील काही भाग मोबाईल नेटवर्कपासून वंचित असल्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी, तसेच नागरिकांना दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सतत पाठपुरावा करून या भागात मोबाईल टॉवर उभारणीला मंजुरी मिळवली.
पर्ये मतदारसंघातील झर्मे, दाबे, हिवरे, गोळावली आणि वांते या गावांमध्ये अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना याचा मोठा फटका बसत होता.
यामुळे संपर्काची अडचण भासत होती. आता, या टॉवरच्या माध्यमातून या गावांमधील नागरिकांना अखेर चांगल्या नेटवर्क सुविधा मिळणार आहेत. या मोबाईल टॉवरचे काम अंतिम टप्प्यात असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे उद्घाटन होणार आहे. या टॉवरच्या माध्यमातून झर्मे, दाबे, हिवरे, गोळावली आणि वांते या गावांना उच्च दर्जाची नेटवर्क सुविधा मिळणार आहे. विशेषतः बीएसएनएल कंपनीच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाच्या सुविधांपासून वंचित ठेवता कामा नये. त्यामुळेच मी या मोबाईल टॉवर प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले. या भागातील नागरिकांना मोबाईल नेटवर्क मिळाल्याने त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. संपर्क सुधारणे ही विकासाची पहिली पायरी आहे आणि आम्ही त्यावर भर देत आहोत. भविष्यात आणखी नवीन सुविधा आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - डॉ. दिव्या राणे, आमदार
नागरिकांना फायदा
आमच्या गावात आता मोबाईल नेटवर्क मिळणार आहे, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आम्हाला आता मुलांच्या शिक्षणासाठी आणि शेतीच्या कामासाठी इंटरनेटचा लाभ घेता येईल, असे एका गावकऱ्याने सांगितले. आता या नव्या सुविधेमुळे सत्तरी तालुका संपूर्णपणे डिजिटल युगात प्रवेश करणार आहे आणि याचा फायदा येथील हजारो नागरिकांना मिळणार आहे.
विकासाचे नवे पर्व
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सरकारने आणि आमदार डॉ. दिव्या राणे यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या काही दिवसांत हे टॉवर कार्यान्वित झाल्यावर सत्तरी तालुक्यातील या गावांना मोबाईल नेटवर्कच्या जाळ्यात आणता येईल. यामुळे या भागाच्या प्रगतीला मोठी चालना मिळेल, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.