सासष्टी: दक्षिण गोव्यातील मीराबाग-सावर्डे येथे झुआरी नदीवर प्रस्तावित असलेल्या बंधारा आणि पंपिंग स्टेशन प्रकल्पावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. गेले २५ दिवस मीराबाग येथील नागरिक या बंधाऱ्याला व पंपिंग स्टेशनला विरोध करून आंदोलन करीत आहेत. २५ दिवसांनंतर हे आंदोलन मडगावच्या लोहिया मैदानावर पोहोचले.
लोहिया मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाही, असे कारण देऊन सर्व आंदोलकांना पोलिसांनी पोलिस स्थानकावर आणले. आंदोलकांनी पोलिस स्थानकावरच आंदोलन केले. या वेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खासदार कॅप्टन विरियातो यांच्यासह गोवा युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक, वॉरन आलेमाव, सिद्धेश भगत व प्रभव नायक यावेळी उपस्थित होते.
आम्हाला लेखी आश्वासन दिले होते की, खणलेले खड्डे तात्काळ बुजविले जातील व काम बंद केले जाईल. मात्र अजून काहीही झालेले नाही. हे लोकांना गृहीत धरण्याची चूक करीत आहेत, असेही संकेत भंडारी यांनी सांगितले.
पणजीत महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे तेथे आंदोलन करता येत नाही, म्हणून येथे लोहिया मैदानावर आंदोलन करावे लागले, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सावियो डिसिल्वा तसेच गोवा फॉरवर्डचे मोहनदास लोलयेकर व विकास भगत, माजी आमदार दीपक पाऊसकर, युवा नेते चिराग नायक व मडगावचो आवाजचे प्रभव नायक यांनीही आंदोलकांची भेट घेतली.
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो यांनी सांगितले की आपण मीराबाग येथील स्थानिकांची समस्या संसदेत मांडणार आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न चालू ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यामध्ये ग्रामीण भागांतील लोकांना सरकारतर्फे कसा नाहक त्रास दिला जात आहे, ते देशवासीयांना कळले पाहिजे, असेही ते म्हणाले.
मीराबाग सावर्डे येथील जुवारी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याला या भागातील सर्व लोकांचा विरोध असून आज कुडचडे बाजारातील व्यवसायिकांनी आपापली दुकाने दुपारी १२ ते १ पर्यंत बंद ठेवून लोकांना आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच प्रसंगी एक दिवस सुद्धा दुकाने बंद ठेवण्यास तयार असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.
गेल्या पंचवीस दिवसापासून मीराबाग येथील स्थानिक लोक बंधाऱ्या विरोधात धरणे आंदोलनाला बसले असून या लोकांचे म्हणणे सरकार ऐकून घेत नसल्याने कुडचडे बाजारातील व्यवसायिकानी संताप व्यक्त केला.
सर्व बाजारकरांनी पाठिंबा देऊन कुडचडे तील बाजार एक तास बंद ठेवण्यात आम्हाला शंभर टक्के यश आल्याचे बाजारकर समितीचे अध्यक्ष रोशा परेरा यांनी सांगितले. कुडचडे बाजारातील लोक मीराबाग येथील लोकांबरोबर आहेत, असे जयकुमार खांडेकर यांनी सांगितले.
मीराबाग बंधाऱ्या विरोधात फलक दाखवले व घोषणा दिल्या म्हणून ज्या चार जणांना अटक केली आहे, त्यांना ताबडतोब सोडा, अन्यथा मडगाव पोलिस स्थानकातून आम्ही जाणार नाही. इथेच बसून राहतील, असे मडगाव पोलिस स्थानकात आंदोलन करीत असलेल्या मीराबागवासीयांच्या वतीने संकेत भंडारी यांनी सांगितले.
भंडारी म्हणाले की, आम्ही आतंकवादी नाहीत. आम्ही भगत सिंग आहोत. देशाच्या स्वातंत्र्यवीरांना अनेकदा त्रास देण्यात आले. पण त्यांनी लढा सोडला नाही. त्या सर्वांचे रक्त प्रत्येक गोमंतकीयांत सळसळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जर पोलिस स्थानकावर आम्हापैकी कोणालाही काही झाले. तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तीन आमदार व गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांवर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे तसेच मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली व त्यांना पोलिस स्थानक सोडून घरी जाण्याची विनंती केली. आंदोलकांतर्फे बोलताना संकेत भंडारी यांनी आमच्या मागण्या सरकारच्या कानावर घालण्याची विनंती केली. उपेंद्र नाईक, हेमंत भंडारी, आपा नाईक, उमेश नाईक या चौघांची सुटका केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असे ठामपणे सांगितले. या प्रसंगी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.