पणजी: गोव्याला केवळ म्हादई नदीचा आधार आहे. तिच्यावरच आम्ही जगतो. त्यामुळे म्हादईला वाचविण्यासाठी, तिच्या संवर्धनासाठी प्रत्येक गोमंतकीयाचे योगदान महत्त्वाचे असून म्हादई संबंधी माहितीचे दस्तऐवजीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केले.
वल्ड वायड फंड फॉर नेचर-भारत या संघटनेने आयोजित म्हादई - गोव्याची जीवनदायिनी या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात प्रा. प्रकाश पर्येकर यांनीही सहभाग घेतला होता. या चर्चासत्राचे समन्वयक म्हणून निर्मल कुलकर्णी होते.
केरकर पुढे म्हणाले की, मी लहानाचा मोठा म्हादईच्या खोऱ्यात झालो आहे. माझ्यासाठी म्हादई नदी ही माझी व्हडली आई आहे. मुळात म्हादई नदी ही गोव्यात येणारच नव्हती खरेतर ही निसर्गाची किमया आहे. म्हादई वळसा घेऊन गोव्याच्या दिशेने वाहते. म्हादईवर आमची लोकसंस्कृती आहे. आदिमानवाची वस्ती तिच्या खोऱ्यात सापडते. हा समृद्ध वारसा आम्हाला म्हादईने दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
कळसा भंडुरा प्रकल्पासाठी ज्यावेळी कर्नाटकाला पर्यावरणीय परवाना देण्यात येत होता, त्यावेळी गोव्यातून म्हादई खाऱ्यातील पाणी अडविण्यात येणारा भाग हा व्याघ्र राखीव क्षेत्र आहे असे नमूद केल्याने स्थगिती मिळाली. त्यामुळे अशा लहान-लहान गोष्टी ज्याचा आयाम, परिणाम मोठा आहे त्याची मदत घेत आम्ही पुढे जाणे गरजेचे आहे. व्याघ्र राखीव क्षेत्र जाहीर केल्यास निश्चितपणे त्याचा फायदा होईल, असे केरकर यांनी सांगितले.
माझे जीवन म्हादईच्या सहवासात गेले. मी ऋतूमानानुसार बदलणारी म्हादई पाहिली आहे. म्हादईचे खोरे पायी चालून मी ती अनुभवली आणि माझ्या काळजात असलेली म्हादई कागदावर उतरली. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असू त्या क्षेत्रात प्रत्येकाने आपापल्या परीने म्हादईच्या संवर्धनासाठी कार्य केले पाहिजे. आजही म्हादई नदीत मासेमारीसाठी जिलेटीन घातले जाते. रेती उत्खनन होते ही रोखण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने कार्य केले पाहिजे असे प्रा.पर्येकर यांनी सांगितले.
आजकाल आम्हाला आमच्या घरातील नळातून पाणी येते हे माहीत आहे, परंतु ते नेमके कोठून येत माहीत नाही. या म्हादईच्या नदीतील पाणी अडविले तर त्याचा परिणाम वन्यजीवांवर होणार आहे. म्हादई खोऱ्यातील वन्यजीवांनी कोठे जायचे ? केवळ मानव नव्हे तर प्राण्याचाही विचार होणे गरजेचे आहे. म्हादई खोऱ्याचे वेगळेपण, म्हादई नदीत असलेल्या विविध मत्स्य प्रजाती आदीची माहिती ठेवून त्याचे संगोपन केले पाहिजे. आज कर्नाटक आपल्या पद्धतीने दस्तऐवजीकरण करत आहे. आम्ही कायदा आणि माहितीच्या अनुषंगाने भक्कम होणे गरजेचे असल्याचे प्रा. प्रकाश पर्येकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.