स्वराज्य, म्हणजे लोकांचे राज्य. रयतेचे राज्य. या रयतेच्या राज्याची निर्मिती छत्रपतींनी केली. प्रजेला जिथे न्याय मिळेल, रयत जिथे घाबरून नाही तर निसंकोचपणे वावरू शकेल अशा राज्याची निर्मिती केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्य निर्मितीनंतर राज्याचा विस्तार झाला, राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी बुरुज भक्कम करण्यात आले, समुद्राच्या वाटेने देखील शत्रू स्वराज्याच्या दिशेने यायला धजावू नये म्हणून आरमारांची बांधणी केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी.
महाराजांच्या निधनानंतर मात्र हेच रुजलेलं स्वराज एका वृक्षात रूपांतरित करण्याची वेळ येऊन ठेपली होती. महाराज असताना दख्खनेच्या सध्या जंगलांमध्ये देखील पाऊल ठेवायला घाबरणारा शत्रू डोकं वर काढण्याच्या तयारीत होता आणि अशावेळी स्वराज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भक्कम खांद्यांवर आली.
छत्रपती शिवजी महाराज यांच्या निधनानंतर समर्थ रामदास यांनी शंभुराजांना एक छान पत्र लिहिलं. पात्राचं कारण वडिलांच्या निधनानंतर त्यांचं सांत्वन करणं होतंच, पण याहीपेक्षा महाराजांची कीर्ती, महाराजांची नीती आणि महाराज नेमके कसे होते आणि त्यांनी स्वराज कसं उभं केलं, त्याचबरोबर आता शंभूराजांकडून काय अपेक्षित आहे याचा उपदेश समर्थांनी या पत्रातून केलाय.
समर्थ रामदास म्हणतात की, परिस्थतीती कोणतीही असली तरीही हे राजन! सतत सावधगिरी बाळगा, कुठल्याही कठीण काळात मनाचे धैर्य सोडू नका. रागाचा त्याग करा, कारण रागच तुमच्या मार्गातील अडथळा बनू शकतो. काहींना क्षमा करा, लोकांना जपून ठेवा,ध्येयाप्रती ते कायम कार्यरत राहतील याची काळजी घ्या.
पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण केल्यास पाण्याचा प्रवाह थांबतो, हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवा कारण मनुष्याच्या बाबतीत हेच लागू होतं, लोकं जेव्हा एकाच प्रवाहात जात असतात तेव्हा चिंतेचं कारण नसतं मात्र यात गट निर्माण होताच परिस्थिती बिघडत आहे हे समजावं.
तुमच्या पूर्वजांनी मिळवलेल्या राज्यासाठी जर कोणी लढायला सुरुवात केली, तर खात्री बाळगा की यामुळे तुमचे शत्रू आनंदी होतील आणि त्यांना तुमच्यावर हल्ला करण्याची संधी मिळेल. तेव्हा कृपया असे काही करू नका. लक्षात ठेवा, जेव्हा दोन लोक भांडतात तेव्हा त्याचा फायदा नेहमीच तिसऱ्या पक्षाला होतो. म्हणून धैर्याने आणि संयमाने मार्गक्रमण करा.
जर तुम्ही लोकांना धमकावले तर तुम्ही त्यांच्याकडून तुमचे काम करून घेऊ शकणार नाही, त्यामुळे लोकांना तैनात करण्याआधी आणि त्यांना आदेश देण्याआधी विचारपूर्वक निर्णय घ्या. जेव्हा लोकं प्रसन्न तेव्हाच ते तुमचं काम मनापासून करतील. ही वस्तुस्थिती जाणून, आपल्या लोकांना सदैव आनंदी आणि समाधानी ठेवा.
लोकांना एकत्र करा आणि तुमच्या शत्रूंचा नाश करा, यामुळे तुमचे नाव आणि कीर्ती आपोआप सर्व दिशांना पसरेल. या राज्याच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करा. जसजसा वेळ पुढे जाईल तसतसे अधिक लोकांना एकत्र करा आणि सर्वत्र एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य बनवा! (भारतात सध्याच्या तारखेतील राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे पण समर्थ रामदासांच्या वेळी महाराष्ट्र ही संकल्पना आजच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांपुरती मर्यादित नव्हती.)
हा सर्वउपदेश केल्यानंतर समर्थ रामदास शंभुराजांना शिवाजी महाराजांचे उदाहरण देत सांगतात की,
शिवरायास आठवावे, जीवित्व तृणवत मानावे
इहलोकी परलोकी राहावे, कीर्तीरुपे
तुमच्या पित्याला, छत्रपती शिवाजी राजांना आठवा. जर तुम्ही तुमच्या वडिलांप्रमाणे कार्य करू शकत नसाल तर तुमचे जीवन त्यांच्या जीवनासमोर गवताच्या पानासारखे आहे हे लक्षात ठेवा.
शिवरायांचे आठवावे स्वरूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप
शिवरायांचा आठवावा प्रताप, भुमंडळी
महाराज कसे होते हे लक्षात ठेवा, महाराजांनी किती कष्ट केले ते लक्षात ठेवा, या जगात यशस्वी होण्यासाठी विजयी छत्रपतींना कायम लक्षात ठेवा.
शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे
शिवरायांची सलगी देणे, कैसे असे
विचार करा, लक्षात ठेवा, महाराज कसे चालायचे, बोलायचे, इतरांशी कसे वागायचे.
सकळ सुखांचा त्याग, करुनी साधिजे तो योग
राज्यसाधनाची लगबग, ऐसी असे
त्यांनी त्यांच्या सर्व सुखसोयींचा त्याग केला, मगच आणि म्हणूनच ते यशस्वी झाले.
त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरूष
या उपरी आता विशेष, काय लिहावे
महाराजांचा आदर्श कायम ठेवत त्याहीपेक्षा महान कार्य कारुन दाखवा.....
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.