हरमल: गेली ४० वर्षे मराठीचा लढा लोकशाही पद्धतीने चालू आहे. राष्ट्रपतींपासून केंद्र व राज्य सरकारने सत्याची कदर केली नाही, ह्याचे दुर्दैव आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात मराठीप्रेमीची मतपेढी (व्होटबॅंक) तयार केल्यास हा लढा यशस्वी होईल, त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याची गरज आहे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
परेश नाईक, गजानन मांद्रेकर, उल्हास कोरगांवकर, गो. रा. ढवळीकर, दिवाकर शिंक्रे, अशोक नाईक, ॲड अमित सावंत, पंच संपदा आजगावकर, माजी महापौर अशोक नाईक, मच्छिंद्र चारी, बाळा नाईक इतर मान्यवर मराठीप्रेमी उपस्थित होते.
मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या प्रखंड मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित मराठीप्रेमी समोर ते बोलत होते. मराठीप्रेमी म्हणून चालणार नसून मराठीप्रेमी शक्तीचे रूपांतर व्होट बँकमध्ये झाले पाहिजे. जो प्रतिनिधी निवडून येणार आहे, त्यास मराठी प्रेमींची मते असल्याचे जाणवले पाहिजे. गोव्यातील चाळीसही मतदारसंघात अल्प संख्याकांबरोबर मराठीप्रेमीची निवडून येण्यासाठी मते लागतात.
त्यामुळे प्रखंड व प्रत्येक ग्राम स्तरावर जाऊन कार्य केले पाहिजे. ग्राम प्रमुखांनी नवीन व ज्येष्ठ लोकांना घेऊन समिती निवडली पाहिजे. या प्रक्रियेत युवा पिढी, मातृशक्ती, नारीशक्ती आदींना मोठ्या प्रमाणात सामावून घेतले पाहिजे. मराठी आमचा स्वाभिमान आहे, ती राज्याची ओळख बनली पाहिजे. मराठी भाषा नव्हे, तो राष्ट्रीय स्वाभिमान आहे. गोव्याचे भवितव्य घडवायचे असेल तर मराठी ही राष्ट्रीय संस्कृती झाली पाहिजे, असे वेलिंगकर म्हणाले.
‘मराप्रस’चे नेते गो. रा ढवळीकर म्हणाले., कोकणी राजभाषा करताना काँग्रेसने सत्य लपवून कोकणीला राजभाषेचा दर्जा दिला. त्यावेळी केवळ दोन शाळा व दोनशे मुले शिक्षण घेत होती. मात्र मराठी सत्तर हजार मुले शिकत होती. सध्या नऊ वर्तमानपत्र असूनही सरकार मराठीला न्याय देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. गजानन मांद्रेकर, निवृत्त शिक्षक कोरगावकर यांनी विचार व्यक्त केले.
मांद्रेच्या देवी भगवती सप्तेश्वर पंचायतन देवस्थानात गाऱ्हाणे घालून आणि मराठीप्रेमींनी शपथ घेत अभिजात मराठी भाषेला राजभाषा करण्याचा निर्धार केला. सोनाली परब परिचय करून दिला. सूत्रनिवेदन परेश नाईक यांनी केले तर तेजा नाईक यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
रविवार, २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता सत्तरी प्रखंडाचा मेळावा वाळपई येथील गोविंद काणेकर सभागृहात होणार आहे. त्यानंतर मंगळवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शिरोडा प्रखंडाचा मेळावा श्री रवळनाथ सभागृहात पार पडणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.