मागच्या आठवड्यात मडगावच्या गांधी मार्केटमधील दुकानात पाणी शिरले. माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी यासंबंधी मडगाव पालिकेला दोषी ठरविले. गटारे न उपसल्याने व पावसाळ्यापूर्वीची कामे न केल्याने ही स्थिती उदभवली, असा आरोप करताना, स्थिती न सुधारली तर पालिकेला जाब विचारणार असा सज्जड इशाराही दिला. बाबू हे ‘बोले तैसे चाले’ या पठडीतले. बाबूचा पालिका मोर्चा काय असतो याचा अनुभव पालिकेला आहे. आता ते खरोखरच पालिकेवर मोर्चा आणतात का, याची प्रतीक्षा मडगावकारांना आहे. कारण उघड आहे. पालिका भाजपची आहे व बाबूही भाजपवाले आहेत. ∙∙∙
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा दिल्लीतील मुक्काम वाढल्याने गोव्यात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. पक्षश्रेष्ठींकडून मंत्री गोविंद गावडे यांना हटविण्यासाठी हवी, असणारी परवानगी घेण्यासाठी नाईक हे दिल्लीला गेले आहेत आणि त्यांना अजूनही परवानगी दिली जात नाही, असे अनेकांना वाटू लागले असणार आहे. मात्र, दामू नाईक यांना जावे लागले ते तेथील दोन दिवसीय चर्चासत्रात सहभागी होण्याकरिता. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन व्याख्यानमालेनिमित्त दोन दिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते, त्यात ते सहभागी झाले होते. सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी आपल्या ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर जी चर्चासत्रांची छायाचित्रे अपलोड केली आहेत, त्यात उपस्थितांमध्ये दामू नाईक दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा दिल्ली मुक्काम वाढला असे स्पष्ट दिसते. आता दोन दिवसीय चर्चासत्र संपल्याने ते पक्षश्रेष्ठींना भेटतील, हे निश्चित मानायला काही हरकत नाही. ∙∙∙
आठ दिवस झाले मंत्री गोविंद गावडे यांना त्यांच्या पदावरून हटवणार, अशी चर्चा राज्यभर सुरू आहे. खरं तर तसे संकेत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी मंत्री गावडेंच्या ‘त्या’ भाषणानंतर दिले होते. पण अजूनही मंत्री गावडेंच्या केसालाही कोणी हात लावू शकलेले नाही. यामुळे आता गोविंदाचा भाजप श्रेष्ठीत कोणीतरी वजनदार, ‘गॉड फादर’ असावा अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि त्याचे अभय असल्यामुळे गोविंद बिनधास्त असल्याचे बोलले जात आहे. आता हा,‘गॉड फादर’ कोण आणि तो गोविंद गावडेंना एवढा पाठिंबा का देतो, यावर वेगवेगळे प्रवाद असले तरी जोपर्यंत हा गॉड फादर आहे, तोपर्यंत गोविंदाच्या मंत्री पदाला भीती नाही, असा सूर या चर्चेतून निघत आहे. आता हा सूर खरा का ही निव्वळ अफवा, याचा फैसला व्हायला आणखी काही दिवस जावे लागणार, असे सध्या तरी दिसतेय. ∙∙∙
वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना गस्तीवरील पोलिसांनी दणका दिला. अचानक पोलिस दिसल्याने वाहन चालक मिळेल ती वाट धरून पळू लागले. त्यांची पळती भुई थोडी झाली. पोलिसही वस्ताद निघाले. मोबाईल वरून वाहन क्रमांक टिपून घेऊन नंतर तालाव घरपोच पाठवून दिले. कायद्याचे हात वरपर्यंत असतात याचा अनुभव आता या तालावधारकांना आला म्हणजे मिळविली. पोलिस खाजगीत तसे बोलतात. ∙∙∙
दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस गोव्यात सर्वच मतदारसंघांना भेटी देत आहे. तेथील लोकांकडे संवाद साधताना व त्यांच्या समस्या जाणुन घेताना दिसत आहे. पक्ष श्रेष्ठीनी त्याला गोव्यात काँग्रेसचे बळ वाढविण्याच्या मोहिमेची जबाबदारी टाकली आहे असे बोलले जाते. आता तर काही प्रमाणात प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्या पेक्षा कॉंग्रेसमध्ये खासदाराचे वजन वाढले आहे, इतकेच नव्हे २०२७ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला सरकार स्थापनेची चांगली संधी आहे, असेही कॉंग्रेसवाले बोलताहेत. कॅप्टन विरियातोंची देहबोली पाहता ते कॉंग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झालीय. ∙∙∙
राज्यात दररोजचे रस्ता अपघातांचे शुक्लकाष्ट काही संपता संपेना. वाहनांमध्ये अपघात होण्याचे प्रकार तर घडत असतात. मात्र रस्त्याने चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. हल्लीच मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात वाहन चालकांना नव्या वा नूतनीकरण परवान्यासाठी ‘राँग साईड ऑफ रोड’ ही फिल्म सक्तीची केली आहे. अपघाताचे प्रमाण पाहिले तर ही फिल्म पाहून वाहन चालकांत अपघातांच्या नियमांबाबत तसेच परिणाम याबाबत कितपत जनजागृती होईल हा प्रश्नच आहे. वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांविरोधात अनेकदा विशेष मोहिमा राबवल्या त्याचा मोठासा फरक पडतच नाही. वाहन चालविताना नियम व अपघाताचे परिणाम याची विचारसरणीबाबत कोणीच करत नाही. बॉडी ओनड् कॅमेऱ्याचे अधिकार फक्त पोलिस निरीक्षकांना मुख्यमंत्र्यांनी दिल्यापासून इतर वाहतूक पोलिस वाहन चालकांच्या नियम उल्लंघनाकडे लक्ष देणेही सोडून दिले आहे. त्यामुळे वाहन चालकांचे चांगलेच फावले आहे. पोलिस निरीक्षक पदाखालील वाहतूक पोलिसांना चलन देण्याचे अधिकार नसल्याने दुचाकीस्वार बेशिस्तपणे वाहने चालवतात. रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आता सरकार कोणता उपाय शोधणार? ∙∙∙
गोवा विधानसभेत सहाचे बारा आमदार करण्यासाठी मराठ्यांनी झटावे, असे विधान एका मराठा आमदाराने दोन वर्षांपूर्वी केले होते. या विधानावरून राजकीय चर्चा रंगली होती.आता काणकोण मतदारसंघात मराठा आमदार निवडून आणू, असे विधान एका मराठा सरपंचाने करून नव्या वादाला खतपाणी घातले आहे. विद्यमान विधानसभेत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये, राजेश फळ देसाई व उल्हास तुयेकर, असे सहा आमदार आहेत व एक राज्यसभा खासदार मराठा समाजातील आहेत.पुढच्या निवडणुकीत आता सहाचे बारा हे गणित साध्य करण्यासाठी मांद्रे, काणकोण, फातोर्डा, केपे, कुंकळ्ळी, कळंगुट , वास्को या मतदारसंघांत म्हणे मराठा समीकरण मजबूत करण्याची धडपड आहे.आता पाहूया हे कठीण गणित असले तरी अशक्य नसलेले समीकरण मराठे कसे सत्यात उतरवतात. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.