म्हापसा, डासांच्या वाढलेल्या संख्येमुळे डेंग्यू, मलेरिया आजाराचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत प्रभाव होऊ शकतो.
किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बार्देश उपजिल्हाधिकारी उदय प्रभू देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१९) तालुका स्तरीय कीटकजन्य रोग नियंत्रणाविषयी आरोग्य केंद्र व इतर प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, आरोग्य केंद्राने स्थानिक पालिका अन् पंचायतीसोबत ‘अँटी कंटेनर ड्राइव्ह’च आणि स्वच्छता मोहिम राबवावी. जेणेकरून पावसाचे पाणी कुठेही साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच जलस्रोत खात्याला बार्देशमधील सर्व मुख्य नाले साफ करण्याची सूचना केली.
त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी असलेले खाली नारळच्या करवंट्या हटविण्याची सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. कारण उन्हाळ्यामध्ये नारळपाणी पिऊन या करवंट्या इतरत्र फेकल्या जातात. त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स उपस्थित होते.
मार्टिन्स पुढे म्हणाले, म्हापसा ते किनारी भाग असलेल्या कळंगुटपर्यंत रस्त्यालगत अनेक अनधिकृत रोपवाटिका व स्क्रॅपयार्ड आहेत. या रोपवाटिका कृषी विभागाकडे नोंदणीकृत नाहीत. तिथे डासांची पैदास होण्याची शक्यता असते. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच काही ठिकाणी फार्म हाऊस ही संकल्पना उदयास आली असून तेथील कचरा व्यवस्थापनाबाबत मार्टिन्स यांनी चिंता व्यक्त केली.
रासायनिक फवारणी नको!
अनेकदा डासांची पैदास रोखण्यासाठी काहीजण परस्पर किटकनाशकांची फवारणी करतात. मात्र, अधिकतर ही फवारणी रासायनिक असतात. त्यामुळे यापुढे अशी फवारणी करतेवेळी आधी आरोग्य केंद्रास कल्पना देणे आवश्यक आहे.
कारण घातक रासायनिकमुळे लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फवारणी ही आरोग्य केंद्रास विश्वासात घेऊनच प्रत्येकाने करावी, अशी सूचना बैठकीत केली गेली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.