डिचोली: हंगाम संपण्याच्या वाटेवर असला तरी अजूनही डिचोली बाजारात अपेक्षेप्रमाणे स्थानिक गावठी ‘मानकुराद’ आंब्याचे दर्शन झालेले नाही. हा आंबा बाजारात उपलब्ध होत असला तरी राज्याबाहेरील आंब्यांच्या तुलनेत त्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, दर स्वस्त होऊनही ‘मानकुराद’ आंबा १४०० ते १५०० रुपये डझन या दराने विकला जात आहे. हापूस आणि राज्याबाहेरील आंब्यांची आवक वाढल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत ‘मानकुराद’ आंबा काहीसा स्वस्त झाला आहे. प्रमाण कमी असल्याने यंदा श्री लईराई देवीच्या धोंड भक्तगणांनाही मानकुरादची अपेक्षेप्रमाणे गोडी चाखता आलेली नाही. जत्रा काळात व्रतस्थ धोंड भक्तगणांकडून विशेष करून ‘मानकुराद’ला मोठी मागणी असते.
यंदा आंबा पिकावर परिणाम झाल्याने बाजारात अपेक्षेप्रमाणे ‘मानकुराद’ची आवक झालेली नाही. त्यामुळे धोंड भक्तगणांना अन्य आंब्यांची चव चाखल्याशिवाय पर्याय नाही. असंतुलित हवामानामुळे ‘मानकुराद’च्या पिकावर परिणाम झाला असल्याचे आंबाविक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच डिचोली बाजारात ‘मानकुराद’ आंबा दाखल झाला होता. मात्र त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे दोन हजार रुपये डझन असा त्याचा दर होता. आता हाच दर १४०० रुपये इतका खाली आला आहे. रत्नागिरी, वेंगुर्ला येथील ‘हापूस’ आंब्यांची आवक वाढल्याने तसेच हे आंबे ५०० रुपये डझन या दराने विकण्यात येत असल्याने अन्य जातीचे आंबेही स्वस्त झाले आहे. त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत ‘मानकुराद’ ५०० ते ६०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. ‘मानकुराद’ महाग असला तरी यंदाही व्रत काळात काहींनी चव चाखली आहे, असे शेखर नाईक या धोंड भक्तगणाने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.