फोंडा: किर्लपाल पंचायत क्षेत्रातील वयली-बांडोळ येथील पाणीपुरवठा करणारी कुपनलिका बंद पडल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी सकाळी धारबांदोडा येथील बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडक दिली. साहाय्यक अभियंता दिनकर मळेकर यांना त्यांनी जाब विचारला. तसेच गढूळ पाणीपुरवठा त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला.
वयली-बांडोळ येथील सुमारे ५० हून अधिक घरांना गेल्या काही वर्षांपासून कुपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम खात्याकडे निवेदने दिली, तरीही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
दरम्यान, साहाय्यक अभियंता दिनकर मळेकर यांनी पुढील काही दिवस साळावली धरणाचे पाणी दिवसातून एक तास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील १५ दिवसांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गावात नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, म्हैसाळ धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या बांडोळ गावातील नागरिकांना शुद्धीकरण केलेल्या पाण्याऐवजी कुपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
देविता गावकर : गढूळ पाणी लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. अनेक वर्षांपासून स्वच्छ पाण्याची मागणी केली जात आहे. सरकारने याची तातडीने दखल घ्यावी.
प्रितेश गावकर : स्वच्छ पाण्यासाठी सध्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. १५ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.