Goa Land Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Land Issue: भू रूपांतराची अपरिहार्यता

Goa Land Issue: त्यावेळी पेडणे येथे बसस्थानक बांधण्यासाठी सरकार जागा निवड करत होते.

अवित बगळेavit.bagle@esakal.com

अवित बगळे

Goa Land Issue: डणे तालुक्यातील भू रूपांतराची चर्चा सध्या जोरात सुरू झालेली आहे. पेडणे विभागीय नियोजन आराखड्यावरून आंदोलन उभे राहते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मुळात पेडणे तालुका आहे तसा ठेवता येणार की नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्याकडे भूरूपांतराच्या चर्चेत दुर्लक्ष होता कामा नये.

शिवोली चोपडे पूल होईपर्यंत पेडणे तालुका तसा उर्वरित गोव्याशी जोडला गेला नव्हता. कोलवाळ- महाखाजन येथे पूल होता. मात्र, पेडणे तालुक्याचा एक वेगळा तोंडवळा शिवोली चोपडे पूल होईपर्यंत कायम राहिला होता. तो पूल झाला आणि पर्यटनाचा एक मोठा लोंढा मोरजीपासून तेरेखोलपर्यंत पसरला आणि त्याने पेडणे (भाषा, संस्कृती, धारणा या अंगाने) कधी गिळंकृत केले हे कोणाला समजलेच नाही.

ते बदल साऱ्यांनी स्वीकारले, त्याची फळे चाखण्यासाठी पेडणेवासीयही पुढे सरसावले. आताही नेमके तसेच घडत आहे. या बदलाला पेडणे तालुकावासीय कसे सामोरे जाणार हे त्यांचे त्यांनी ठरवायचे आहे. पेडण्यात आता भू रूपांतराची अपरिहार्यता निर्माण झाली आहे, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. मोठे प्रकल्प पेडणे तालुक्याने ज्या दिवशी स्वीकारण्याचा निर्णय घेतला किंवा पेडण्यात ते होऊ घातले त्या दिवशीच आजचा दिवस उजाडणार हे ठरून गेलेले होते.

पेडण्याच्या जतन, संवर्धनासाठीच्या आराखड्यासाठी आधी सरकारने तयार केलेला विभागीय नियोजन आराखडा समजून घेतला पाहिजे. नियोजन आराखडे तयार करताना भविष्यात होऊ घातलेल्या बदलाची नोंद त्यात घेतली जाते. ज्याला सर्वसाधारण माणूस भू रूपांतर म्हणतो ती प्रत्यक्षात मात्र भविष्यातील सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी जमिनीची तरतूद करण्याची प्रक्रिया असते.

मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. पश्चिम भारतातील आयात निर्यातीचे मोठे केंद्र म्हणून मोप विमानतळ आकाराला आणि नावारूपाला येणार आहे. त्याला लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यात सेवा बजावणारे कर्मचारी असा मोठा ताण पेडण्याच्या भूमीला सहन करावा लागणार आहे. यासाठीही जमिनीची गरज लागणार आहे. तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी उभी राहिली की तेथे येणारे उद्योग त्यांना लागणारा कच्चा माल, सोयीसुविधा पुरवणारे पुरवठादार तेथे काम करणारे कर्मचारी हे पेडणे परिसरातच निवारे शोधणार आहेत. विमानतळामुळे पर्यटन वृद्धी होईल हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचाही ताण पेडणे तालुक्यालाच सोसावा लागणार आहे.

या साऱ्या विकासाच्या संधी पेडणेवसीय कसा घेणार याचे नियोजन केले गेले पाहिजे. केवळ विरोधासाठी विरोध करून चालणार नाही. पूर्वी जसे गाव होते, ते जसे आज आहेत तसेच ते उद्या राहणार नाहीत हेही समजून घेतले पाहिजे. शेती खालील जमीन कमी कमी होत जाणार हे ठरून गेलेले आहे आणि ते अटळ आहे. पेडण्याचा तोंडवळा बदलला जाणार हे आता नक्की झाले आहे. मात्र, तो कसा असावा हे पेडणे तालुकावासीय आजही ठरवू शकतात.

नगर नियोजन खात्याने पेडणे विकासाच्या विभागीय नियोजन आराखड्याच्या मसुद्याने ती संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आधी गावावर नियोजन आराखडे मिळवून ते तपासून घेतले पाहिजेत. कोणत्या ठिकाणी जमीन घरे बांधण्यासाठी, वाणिज्यिक वापरासाठी, सार्वजनिक सुविधा निर्मिती करण्यासाठी कशी ठेवली गेली आहे याची चर्चा गावात आणि ग्रामसभातून व्हायला हवी. त्या आराखड्यात असल्यास ते सुचवले गेले पाहिजेत. आमच्या गावची दारे आता आम्ही इतरांसाठी उघडणार नाही अशी भूमिका कोणी घेऊ शकणार नाही.

पेडण्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या, विकासाच्या, अर्थार्जनाच्या संधी घेण्यासाठी उर्वरित गोव्याप्रमाणे पेडण्यातही सगळीकडचे लोक धाव घेतील आणि ते टाळता येणारे नाही. त्यामुळे नियोजन आराखडा तयार करताना सरकारने काय काय डोळ्यासमोर ठेवले आहे हे समजून घेऊन त्या संधी स्थानिकांनाच कशा मिळतील याचे नियोजन करणारा एक समांतर आराखडा पेडण्यातील सामाजिक कार्यकर्ते, समाज धुरीणांनी आणि लोकप्रतिनिधींनी तयार केला पाहिजे. आराखड्याचे समर्थन करणारे आणि आराखड्याला विरोध करणारे असे दुही निर्माण करणारे चित्र तालुक्याच्या विकासाला खो घालू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सुसंवादातच पेडण्याचे हित आहे हे ध्यानात ठेवून आता पुढची पावले टाकावी लागतील.

हे काम दिसते तितके सोपे नाही. वैयक्तिक स्वार्थ, राजकीय अभिनिवेश, संकुचित वृत्ती सारे काही बाजूला सारून, मागे टाकून पेडणे तालुक्यातील तमाम लोकांनी या मुद्यावर एकत्र आले पाहिजे. पेडण्याच्या विकासाची दिशा कशी असावी यावर विचार मंथन केले पाहिजे. विकासाची गती आता पेडणेवासीयांच्या हाती राहिलेली नाही. मात्र, त्याला योग्य दिशा देणे अद्यापही हाती आहे. नगर नियोजन खात्याच्या विभागीय आराखड्याची पायरी यासाठी केली गेली, तरच पेडण्यासाठी तो सुदिन ठरेल!

आरोग्य पर्यटनावर भर : धारगळ येथे आयुर्वेदाची अखिल भारतीय संस्था सुरू झालेली आहे. सरकारच्या धोरणानुसार आरोग्य पर्यटनावर भर दिला जाणार आहे. किनारी भागात सध्या फोफावलेली आयुर्वेद उपचार पद्धतीची दुकाने पाहिल्यास धारगळकडे विदेशी रुग्णांची पावले वळू लागली की त्या परिसरामध्ये आणखी कोणत्या सोयी सुविधा येतील याची कल्पनाच सध्या करवत नाही.

पेडण्याच्या जतन, संवर्धनासाठी आराखड्याची गरज

मुंबई महानगराचा ज्या गतीने विकास झाला आणि त्या गतीशी जुळवून घेऊ न शकणारा मराठी माणूस वसई विरार आणि बेलापूरपर्यंत कसा फेकला गेला याचा अभ्यास पेडण्यातील बुद्धिवादी लोकांनी आधी केला पाहिजे. पेडण्याच्या विकासाची गती येणाऱ्या काळात मुंबईच्या विकासाच्या गती एवढीच होणार आहे हे आज कोणाला सांगितले, तर क्षणभर त्यांना ते पटणार नाही. मात्र, हे वास्तव नजरेआड करता येणारे नाही. त्यामुळे काळाची पावले ओळखत आणि त्याच्या गतीशी जुळवून घेत पेडण्याचे जतन, संवर्धन, संरक्षण कसे करता येईल याचा एक दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT