Goa Vegetable Prices Update: राज्यात मागील दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर चढेच आहेत. कांदा, बटाट्याचे दर सोडल्यास इतर भाजीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. अनेक फळभाज्यांनी शंभरी पार केली आहे.
सध्या राज्यात पुरुमेंताची तयारी सुरू असून मोठ्या प्रमाणात लाल मिरची, मसाले तसेच इतर साहित्य खरेदी केले जात आहे. यंदा राज्यात गावठी मिरची ५०० ते ७०० रुपये किलो दराने विकली जात आहे; परंतु लसणीच्या दराचा उडालेला भडका कायम असून पणजी बाजारात मध्यम आकाराची लसूण ३६० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
राज्यात उष्म्यामुळे भाजी तसेच फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे फळे तसेच भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उन्हापासून दिलासा देणाऱ्या लिंबांचे दर ऐकून घाम फुटत आहे. मध्यम आकाराचे लिंबू ७ रुपयांना एक अशा दराने विकले जात आहे. लहान आकाराची दहा लिंबे ५० रुपयांना विकली जात आहेत.
दरम्यान, राज्यात मागील दोन महिन्यांपासून सातत्याने भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. खुल्या बाजाराच्या तुलनेत फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर स्वस्त दरात भाजी विक्री होत असल्याने आता अनेक नागरिक वाढत्या महागाईत फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर भाजी खरेदी करत आहेत.
पणजी बाजारात गावठी भाज्यांना चांगली मागणी असून भाजीची केळी, अळू माडी, भोपळा तसेच पालेभाज्या, वाली आदींना चांगली मागणी अाहे. आंबे, फणसही विकले जात आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.