डिचोली: मोसमी पावसाने माघार घेतली असे वाटत असतानाच, आता पावसाचा कहर सुरू झाला आहे. विजांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसामुळे कापणीसाठी तयार झालेली मयेसह डिचोलीतील विविध भागातील भातशेती पाण्याखाली आली आहे. पावसाच्या तडाख्यात मये येथील ऐन बहरात आलेले भात पीक आडवे झाले आहे. त्यामुळे बळीराजा पूर्णपणे अस्वस्थ बनला असून त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे.
गेले सलग दोन दिवस पावसाने दिलेल्या तडाख्यात डिचोलीतील विविध भागातील भातशेतीत पाणी साचले असून काही ठिकाणी भाताची कणसे आडवी झाली आहेत. डिचोलीतील बहुतांश भागात भात पीक कापणीसाठी तयार झाले असून बळीराजाने कापणीच्या कामाला हात घालण्याची तयारी केली होती.
मात्र, पावसाने कहर केल्याने भात शेतीत पाणी साचून भाताची कणसे आडवी झाल्याने कापणीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे.
कृषी कार्यालयात निवेदन
कापणी आणि मळणी यंत्राच्या अनुपलब्धतेमुळे भाताची कापणी अडून पडली आहे. कापणी यंत्र त्वरित उपलब्ध करुन द्या अशी मागणी मये येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या शेतकऱ्यांनी आज डिचोलीच्या विभागीय कृषी कार्यालयात निवेदन दिले आहे.
पावसाचा तडाखा कायम राहिल्यास यंदा भात पिकाची नाशाडी अटळ आहे, अशी भीती शेतकरी विश्वास चोडणकर आणि दामोदर गोसावी यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.