पणजी: गेल्या पाच वर्षांच्या काळात ८,४२५ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगालसह इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले. यापैकी ८,३७० म्हणजेच ९९.५४ टक्के गोमंतकीयांनी पोर्तुगालला पसंती दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, विजय सरदेसाई आणि ॲड. कार्लुस फेरेरा यांनी संयुक्तरित्या याबाबतचा प्रश्न विचारला होता. भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून गेल्या पाच वर्षांत जे गोमंतकीय विविध देशांमध्ये गेले, त्यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा सरकारने अभ्यास केलेला आहे का? असा प्रश्नही या आमदारांनी विचारला होता.
त्यावर हे नागरिक स्वत:च्या आवडीनुसार इतर देशांमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा राज्य सरकारने अभ्यास केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. इतर देशांमध्ये स्थायिक झालेल्या गोमंतकीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व मिळावे, यासाठी राज्य सरकारने काही प्रयत्न केले आहेत का?
या त्यांच्या प्रश्नावर, नाही, परदेशी नागरिकत्व मिळवण्याचा निर्णय ही पूर्णपणे व्यक्तीची वैयक्तिक निवड असते. भारतीय संविधानाच्या कलम ९ नुसार दुहेरी नागरिकत्व ‘अनुज्ञेय’ नाही. शिवाय नागरिकत्व हा विषय केंद्र सरकारचा असून, कोणत्याही राज्याला विशेष अपवाद न ठेवता संपूर्ण भारतात तो समानपणे पाळला जातो, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.