पणजी: गोमंतक भंडारी समाजाच्या निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ॲड. अनिश बकाल व ॲड. अतिश मांद्रेकर यांनी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक व इतर समिती सदस्यांविरुद्ध पणजी पोलिसात दाखल केलेली तक्रार (एफआयआर) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्दबातल ठरविली. तक्रारीविरोधात अशोक नाईक व इतरांनी आव्हान दिले होते.
गोवा खंडपीठाच्या या निर्णयामुळे माजी समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यासह पाचजणांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशोक नाईक व इतरांच्या याचिकेवरील मागील प्राथमिक सुनावणीवेळी पणजी पोलिसांसह ॲड. अनिश बकाल व ॲड. अतिश मांद्रेकर यांनाही खंडपीठाने नोटीस बजावली होती.
आज झालेल्या सुनावणीवेळी पोलिसांतर्फे बाजू मांडताना सरकारी वकिलांनी माहिती दिली की, प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तक्रार दाखल करून घेण्यात आली. या तक्रारीच्या चौकशीत प्रथमदर्शनी निधीचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत नाही. ज्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे, त्यांना चौकशीसाठी बोलावून जबान्या नोंदवल्या आहेत. त्यांनी तपासकामात सहकार्य केले असून कथित आरोपासंदर्भातचे स्पष्टीकरणही दिले आहे. त्यामुळे गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत नाही. या सुनावणीवेळी बकाल व मांद्रेकर उपस्थित राहिले नाहीत.
गोमंतक भंडारी समाजाच्या नावाने बँक खाते उघडून निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ॲड. अनिश बकाल व ॲड. अतिश मांद्रेकर यांनी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक, विद्यमान अध्यक्ष देवानंद नाईक, कृष्णकांत गोवेकर, झोगुसो नाईक व फक्रू पणजीकर यांच्याविरुद्ध पणजी पोलिसांत तक्रार केली होती.
मात्र, ती नोंदवून गुन्हा दाखल करण्यात पणजी पोलिसांनी नकार दिल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या कलम १५६(३) खाली ती नोंदवून घेण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतल्यानंतर ती रद्द करण्यासाठी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक यांच्यासह पाचजणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली होती.
तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार खोटी व राजकीयदृष्ट्या प्रेरित असून त्याच्या आधारावर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे, असे याचिकेत म्हटले होते. याचिकादारांनी कोणताच गुन्हा केलेला नाही. १० लाखांची रक्कम एका बँकेतून दुसऱ्या बँकेत धनादेशाने दिली आहे. या समितीचे सरचिटणीस असलेले उपेंद्र गावकर यांनी तक्रारदारांना फुस लावून या तक्रारी दाखल करण्यास भाग पाडले, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
गोमंतक भंडारी समाजाच्या कार्यकारी समितीच्या निवडणुकीपूर्वी या खोट्या तक्रारी समाजाच्या दोघा वकिलांनी विरोधकांच्या सांगण्यावरून दाखल केल्या होत्या. पोलिसांनी आम्हाला या चौकशीदरम्यानच ‘क्लिन चीट’ दिली होती. समाजाच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. न्यायालयाच्या या निर्णयाने सत्य समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक व विद्यमान अध्यक्ष देवानंद नाईक यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.