पणजी: भंडारी समाजातील दोन अस्वस्थ प्रमुख नेते दयानंद मांद्रेकर आणि किरण कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांना जाऊन भेटणे, याचा राजकीय वेगवेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न सुरू असून भाजपमधील धोरणी नेते या प्रकाराकडे भांबावून पाहू लागले आहेत.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीला दीड वर्ष असले तरी भाजपने प्रत्येक मतदारसंघात जोरदार मेळावे सुरू केले आहेत. सत्तारूढ भाजप गटाला मोठ्या प्रमाणात लोक जमवण्यात यश येत असले आणि प्रदेशाध्यक्षपदी नव्याने आलेले दामू नाईक धडाडीने आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांनाही समाजातील प्रचंड अस्वस्थता काबूत आणण्यात अपयश आले आहे.
‘‘गोव्यात भंडारी समाजावर अन्याय सुरू आहे. सर्वेक्षणातूनच हा अन्याय दूर होऊ शकतो. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका’’, असे सांगून किरण कांदोळकर यांनी अस्वस्थ भंडारी नेत्यांनी भाजपमधील अन्यायाविरोधात मोर्चेबांधणी सुरू केल्याचे सूतोवाच केले. दयानंद मांद्रेकर यांनी यापूर्वीच आपले राजकीय हितसंबंध यापुढे भाजपबरोबर राहतील काय, यासंदर्भात संशय व्यक्त केला आहे.
गोव्यातील भंडारी समाज हा एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के असल्याने या समाजाला आपल्या हिश्श्याचा राजकीय वाटा मिळत नाही, अशी भावना बनली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारात सध्या भंडारी समाजाचे रवी नाईक हे मोठे नेते असले तरी त्यांचा आणि सुभाष शिरोडकर यांचा सरकारात तसा मोठा प्रभाव नाही.
शिवाय रवी नाईक यांचे मंत्रिमंडळातील अस्तित्वही सध्या दोलायमान बनले आहे. दोन महिन्यांपूर्वी श्री देव रुद्रेश्वराची रथयात्रा चाळीसही मतदारसंघांत फिरवण्यात आली. भंडारी समाजात जागृती व राजकीय चळवळ सुरू करण्याचा त्यामागचा इरादा होता.
ही जरी रवी नाईक यांची संकल्पना असली तरी त्या रथयात्रेमध्ये किरण कांदोळकर आणि दयानंद मांद्रेकर यांनीही आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली आणि चाळीसही मतदारसंघांत त्यांनी गाठीभेटी घेण्यासाठी या रथयात्रेचा वापर केला. विजय सरदेसाई यांना हे दोन नेते भेटले याचा अर्थ दोघेही भाजपवर खुश नाहीत, असा घेतला जात असून, दोघांनीही विजय सरदेसाई यांच्याकडे गोव्यात भरभक्कम राजकीय आघाडी निर्माण करण्याचे सूतोवाच केले आहे.
भंडारी समाज काँग्रेस पक्षाला फारसा विश्वासार्ह मानत नाही. तेथे गिरीश चोडणकर यांनाही गोव्यात फारसे अस्तित्व नाही. त्यांना दोन महत्त्वाची राज्ये देण्यात आली असली तरी ते गोव्यापासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर भंडारी समाज विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डकडे आशेने पाहात असून त्यांच्या कालच्या बैठकीनंतर त्यांनी ज्याप्रकारे पत्रकार परिषद घेतली, फोटो काढू दिले, याचा अर्थ ते बिनदिक्कतपणे विजय सरदेसाईंबरोबर जाहीरपणे आघाडी रचू पाहात आहेत.
दुसऱ्या बाजूला भंडारी समाजाचे साळगावचे नेते जयेश साळगावकर, दुसरे तरुण नेते दत्तप्रसाद नाईक हेसुद्धा अस्वस्थ आहेत. दोन दिवसांपूर्वी तेथील आमदार केदार नाईक यांनी साळगाव येथे जो मोठा मेळावा घेतला, त्याला मतदारसंघातील दोन भंडारी भाजप नेते दिलीप परूळेकर आणि साळगावकर या दोघांनाही साधे आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते दोघेही अस्वस्थ झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.