
बार्देश: भंडारी समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मोठी घोषणा करताना या समाजाचे नेते डॉ. तारक आरोलकर यांनी ५ हजार स्क्वेअर मीटर जमीन भंडारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी दान केली.
आरोलकर म्हणाले, भंडारी समाजातील अनेक कुटुंबे अजूनही आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. तसेच युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत नाहीत. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे. असे उद्गार भंडारी समाजाचे नेते डॉ. तारक आरोलकर यांनी काढले.
म्हापसा येथील प्रगती हॉलमध्ये भंडारी समाजाच्या वतीने डॉ. तारक आरोलकर यांचा सत्कार सोहळा घडवून आणण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी भंडारी समाजाच्या स्थितीवर प्रकाश टाकला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी कला-संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर, खास अतिथी माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, अध्यक्षस्थानी भंडारी समाजाचे अध्यक्ष रोहिदास नाईक, सचिव देश किनळेकर, चारुदत्त पणजीकर, नगरसेविका शुभांगी वायंगणकर, अन्वी कोरगावकर, विकास आरोलकर, नगरसेवक सुशांत हरमलकर व मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक दिल्लीत असल्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी ऑडिओ संदेशाद्वारे तारक आरोलकर यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, तारक हा समाजासाठी झटणारा नेता आहे. त्यांना पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा.
जनार्दन ताम्हणकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. सुभाष कौठणकर यांनी केले तर सचिव देश किनळेकर यांनी आभार मानले.
शिवोलीतून पुन्हा लढणार; दयानंद मांद्रेकर
भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दुसऱ्या फळीतील राजकीय पिढी घडविणे अत्यावश्यक आहे. समाजाने एकसंघ होऊन पुढे जाण्याची गरज आहे. डॉ. तारक आरोलकर हे समाजाच्या उन्नतीसाठी सक्षम नेतृत्व देतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसून आली. भविष्यात भंडारी समाजासाठी ते कशाप्रकारे कार्यरत राहतील याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागून राहिले आहे असे सांगून आगामी काळात आपण शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा दयानंद मांद्रेकर यांनी केली.
यावेळी डॉ. तारक आरोलकर यांच्या मातोश्री श्रीमती आरोलकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर व दिलीप परुळेकर यांच्या हस्ते भंडारी समाजाच्या वतीने तारक आरोलकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हनुमान नाईक यांनी आरोलकर यांच्या कार्याची व त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारांबाबत माहिती दिली. सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजाचे ज्येष्ठ नेते व बाळ्ळीचे माजी सरपंच रोहिदास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.