पणजी: भाजी उत्पादनासाठी लागणारी सर्व संसाधने असूनही आपल्याला शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागत असल्याने गोव्याला भाजी उत्पादनात ‘स्वयंपूर्ण’ बनवण्याचा ध्यास घेणारा युवा शेतकरी वरद सामंत यांची गोवा सरकारने कृषिदूत (ॲम्बेसेडर) म्हणून निवड केली आहे.
राज्यात भाजी उत्पादनात नव-नवीन प्रयोग यशस्वी करून वरद यांनी इतर शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच वरद यांची गोवा सरकारने कृषिदूत म्हणून निवड केली. एखाद्याची कृषिदूत म्हणून गोव्याने पहिल्यांदाच निवड केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृषी संचालनालय आणि गोवा राज्य फलोत्पादन महामंडळ यांना निर्देश दिले आहेत की, सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. भाजी उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन करावे. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता, नफा आणि आत्मनिर्भरता वाढीस लागेल.
वरद सामंत हे मागील बारा-तेरा वर्षांपासून दाभाळ-धारबांदोडा येथे भाजीपाला लागवड करत आहेत. त्यांनी आपल्या ८ एकर क्षेत्रफळातील जमिनीत गाजर, काकडी, मिरची, कलिंगड आदी विविध भाज्या आणि फळांचे उत्पादन घेतले असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलाविण्यात आले आहे.
जर एखाद्या शेतकऱ्यांकडे १ एकरची शेती असेल तर त्यात भाजीपाला उत्पादन करून वर्षाला ६ लाख रुपयांपर्यंत शेतकरी कमाऊ शकतो. आपल्याकडे जी काही भाजी परराज्यातून येते ती रसायनयुक्त असते, त्यामुळे युवकांनी शेतीकडे वळावे व रसायनयुक्त भाजीसेवनापासून गोव्याला सुरक्षित ठेवावे. फलोत्पादन महांडळाकडूनही चांगला हमीभाव देण्यात येतो, त्याचा लाभ घेत गोव्याला भाजी उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. - वरद सामंत, युवा शेतकरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.