पणजी: खरा विकास हा केवळ आर्थिक वाढ आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नाही तर तो जनतेचा आनंद, समाधान आणि सर्वांगीण कल्याणावर मोजला गेला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी सोमवारी पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी राज्य विधानसभेला संबोधित करताना केले.
नागरिकांचे आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, संस्कृती आणि सामुदायिक जीवन या निकषांवर आधारित ‘हॅपीनेस इंडेक्स’ (आनंद निर्देशांक) तयार करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरेल, अशी घोषणाही राज्यपालांनी केली. शिरगाव येथील श्री देवी लईराई देवीच्या जत्रेतील चेंगराचेंगरी, हडफडे येथील आग दुर्घटना तसेच रस्तेअपघातांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या.
राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना राज्यपालांनी सांगितले की, गोव्यातील शासन व्यवस्था विकास, सार्वजनिक कल्याण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर केंद्रित आहे. राज्याने २०३७ पर्यंत विकसित राज्य होण्याचे लक्ष्य निश्चित केले असून सध्या
अंतिम टप्प्यात असलेला ‘गोवा व्हिजन २०५०’ हा दस्तऐवज ‘विकसित गोवा’साठीचा सर्वसमावेशक मार्गदर्शक ठरेल. हा आराखडा ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीएसटी सुधारणांचे राज्यपालांनी अभिनंदन केले.
राज्यातील तिसऱ्या ‘कुशावती’ जिल्ह्याच्या निर्मितीचा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले की, हा निर्णय विकेंद्रीकरण, सुशासन आणि समतोल प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विविध खात्यांची मुख्यालये व कार्यालये नव्या जिल्ह्यात स्थापन केल्याने रोजगारनिर्मिती होईल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि आर्थिक विकासास गती मिळेल. नव्या जिल्ह्यामुळे नागरिकांना जिल्हास्तरीय सेवा अधिक जलद मिळतील, मुख्यालयापर्यंतचा प्रवास कमी होईल, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावी होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.