पणजी: गोव्यातील सध्याचे वन्यजीव व्यवस्थापन केवळ कागदावर आहे. प्रत्यक्षात वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि त्यांचे जीवनमान सुरक्षित ठेवण्याचे काम दुर्लक्षित होत आहे. स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करणे आवश्यक असताना वन अधिकाऱ्यांना ते जमलेले नाही, अशी घणाघाती टीका पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, आज गोव्यात मानवी विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. रस्ते, इमारती, पर्यटन प्रकल्प या सगळ्यांना गती मिळते; पण जंगलातील प्राणी आणि त्यांच्या जगण्याच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित राहतात. मानवाला मतांचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या मागण्या ऐकल्या जातात. मात्र मुक्या प्राण्यांना मताचा हक्क नसल्याने त्यांच्या अस्तित्वाकडे समाज दुर्लक्ष केले जाते, असा खंतावलेला सूर केरकर यांनी व्यक्त केला.
पूर्वी जंगलात बिबट्यासारख्या शिकारी प्राण्यांना मुबलक प्रमाणात तृणाहारी प्राणी, पाणी आणि नैसर्गिक अन्नसाखळी मिळत होती. मात्र, आता जंगलातील अन्नसाखळी खंडित झाली आहे. त्यामुळे बिबट्या कुत्र्यांची किंवा गुरांची शिकार करू लागला आहे. जंगलातील तृणाहारी प्राणी देखील कमी झाले आहेत आणि त्यामुळे बिबट्याचा जगण्यासाठीचा संघर्ष वाढला आहे, असे केरकर यांनी स्पष्ट केले.
केरकर म्हणाले, वाळपईत शिकाऱ्यांना जंगली प्राण्यांची शिकार करताना स्वतःच्या जीवाला मुकावे लागले. पोलिस खाते कारवाई करते; पण वन खाते या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. शिकार थांबवण्यासाठी वन विभागाने अधिक सक्रिय भूमिका बजावली पाहिजे; अन्यथा जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.