पणजी: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, तापमानाचा पारा सातत्याने वाढतोय. गोव्यात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावले आहे. केवळ तापमानच नाही, तर हवेतील आर्द्रतेचे (Humidity) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने उष्म्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. घामाच्या धारा आणि अंगाची होणारी लाहीलाही यामुळे गोवेकर पुरते हैराण झाले असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात कमाल ३४.५ अंश सेल्सिअस तर किमान २४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदा उष्णतेसोबतच हवेतील ओलावा म्हणजेच आर्द्रता ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही आर्द्रता सर्वसाधारण प्रमाणापेक्षा ९ टक्क्यांनी अधिक आहे. जेव्हा हवेत आर्द्रता जास्त असते, तेव्हा शरीराला घाम जास्त येतो आणि तो लवकर सुकत नाही, ज्यामुळे उकाडा असह्य होतो. याच कारणामुळे ३४ अंश तापमान असूनही प्रत्यक्षात ते ४० अंशांइतके तीव्र जाणवत आहे.
वाढत्या उष्म्याचा परिणाम पर्यटनावर आणि स्थानिक बाजारपेठांवरही दिसून येत आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांनी आता सावलीचा आधार शोधण्यास सुरुवात केली आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. शीतपेये, शहाळी आणि रसवंती गृहांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे अस्वस्थता, डोकेदुखी आणि डिहायड्रेशनच्या तक्रारींमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागरिकांनी या वाढत्या उष्म्यात स्वतःची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पाणी पिणे, सुती आणि हलके कपडे वापरणे, कडक उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे, जेणेकरून उष्माघातासारख्या (Heat Stroke) समस्यांपासून बचाव करता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.