पाण्याखालील समुद्री शेवाळी जंगले समुद्री जीवसृष्टी, किनारपट्टीवरील उपजीविका आणि समुद्री अन्नसंस्कृतीला आधार देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. गोव्याच्या समुद्रातील अशी जंगले मात्र अजूनही पुरेशा प्रमाणात नोंदवली गेलेली नाहीत किंवा त्यांना संरक्षणही नाही’, असे गोव्यातील समुद्री संशोधक व शिक्षिका गॅब्रिएला डी’क्रूझ यांचे म्हणणे आहे.
ही जंगले नोव्हेंबर ते मार्चदरम्यान खडकाळ समुद्रकिनाऱ्यालगत वाढतात. दाट पाण्याखालील आवरण तयार करून आणि माशांच्या संख्येला आधार देत असूनही, ही जंगले गोव्यातील मुख्य पर्यावरण संवर्धन चर्चेत नाहीत.
किनारपट्टीचे जीवन आणि समुद्री अन्न गोव्यातील संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असला, तरी हे अन्न नेमके कुठून येते किंवा समुद्री परिसंस्था किती निरोगी आहेत, यावर फारसा विचार कधी केला जात नाही.
गोव्याच्या किनाऱ्यावर समुद्री शेवाळाची जंगले आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी. ‘जर निरोगी शेवाळाची जंगले नसतील, तर माशांची संख्या घटेल आणि याचा थेट परिणाम मासेमारी समुदायांवर आणि गोव्याच्या समुद्री अन्नसंस्कृतीवर होईल.’ असे गॅब्रिएला डी’क्रूझ म्हणाल्या.
‘द स्टोरी ऑफ सीवीड’ या सत्रात, कथाकथनकार गॅब्रिएला डी’क्रूझ यांच्यासह नेफरटिटी तितली आणि अॅशेल उंगर यांनी गोव्यातील हंगामी शेवाळी जंगलांचे पर्यावरणीय महत्त्व ‘मोग’ (म्युझियम ऑफ गोवा) येथील कार्यक्रमात स्पष्ट केले.
कार्यक्रमातील चर्चेदरम्यान शेवाळांच्या हंगामी चक्राचा समुद्री जैवविविधतेशी कसा संबंध आहे, यावरही प्रकाश टाकण्यात आला. ही पाण्याखालील जंगले दुय्यम नसून, अनेक समुद्री प्रजातींना आधार देणाऱ्या मूलभूत परिसंस्था आहेत आणि किनारपट्टीच्या संरक्षणातही त्यांची भूमिका आहे.
समुद्राचे वाढते तापमान हा हवामान बदलामुळे त्यांना निर्माण होणारा मोठा धोका असतो; कारण उष्ण पाण्यात शैवाळ वाढणे कठीण होते. महत्त्वाची असूनही, ही शैवाळाची जंगले नजरेआड राहिली आहेत.
त्यामुळे एकीकडे ती अतिवापरापासून वाचली आहेत, पण दुसरीकडे सांस्कृतिक आणि कायदेशीर मान्यता मिळण्यापासूनही ती दूर राहिली आहेत. ‘जी गोष्ट दिसत नाही, तिला संरक्षण मिळत नाही. तिच्यासाठी कायदे नाहीत, त्यांच्या कथा नाहीत आणि त्यांना फारसे समर्थकही नाहीत,’ असे गॅब्रिएला म्हणाल्या.
किनाऱ्यावर आलेले शेवाळ मच्छीमार समुदायांकडून नारळाच्या झाडांसाठी खत म्हणून वापरण्याच्या पद्धतींचा उल्लेख करून, गॅब्रिएला म्हणाल्या की अशा पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या त्यांच्या नात्यांकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही.
शेवाळाची जंगले समजून घेण्यासाठी, नोंदवण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी मच्छीमार समुदायांशी संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे. “तेच खरे निरीक्षक आहेत. त्यांचे ज्ञान फार महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या सत्रानंतर उपस्थितांनी ‘स्टेप इन्टू द सी’ हा दृश्यचित्रण, कथाकथन आणि थेट ध्वनिसंगीत यांच्या साहाय्याने तयार केलेला प्रकल्पही अनुभवला. समुद्रात न जाता, गोव्यातील समुद्री शेवाळाच्या जंगलातून पोहत असल्याचा थरारक अनुभव त्यांना त्यातून मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.