पणजी: मान्सूनच्या पावसाने राज्यात हजेरी लावल्याने नद्यांमधील पाण्यात वाढ होत चाललेली आहे. नद्यांमधील पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पेयजल खात्यामार्फत नागरिकांना पुरवण्यात येत आहे. त्यामुळे जलसंपदा खात्याने धरणांमधील पाण्याचा जलशुद्धीकरण प्रकल्पांना होणारा पुरवठा थांबवला आहे.
धरणांतील पाणी वाढवण्याकडे खात्याने लक्ष दिले आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली. राज्यात यंदा ५ जून रोजी मान्सून दाखल झाला. पण, त्यानंतर २१ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाने राज्याकडे पाठ फिरवली होती. परिणामी, नद्या कोरड्या पडण्यास सुरुवात झाली होती.
दुसरीकडे धरणांमधील पाण्याच्या साठ्यातही घट होत होती. त्यामुळे सरकार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण, २२ जूनपासून पावसाने सुरुवात केली. काही भागांमध्ये मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत प्रत्येक दिवशी वाढ होत चालली आहे.
त्यामुळे पेयजल खात्याने नद्यांचे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात नेऊन आणि त्यावर प्रक्रिया करून ते जनतेला देण्यास सुरुवात केली आहे. शिवाय पेयजल खात्याने जलस्रोत खात्याकडे जलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी गेल्या काही दिवसांत पाणीही मागितलेले नाही.
त्यामुळे जलस्रोत खात्याने धरणांतील पाणी प्रकल्पांना देणे थांबवले आहे, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय हवामान विभागाने यंदा मान्सूनचा पाऊस कमी असेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे धरणांमध्ये अधिकाधिक पाण्याचा साठा करण्यावर जलस्रोत खात्याने भर दिलेला असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.