Shirgao Encroachment Demolition: गेल्या वर्षी शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेत घडलेल्या भीषण चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने संपूर्ण गोवा हादरला होता. या दुर्घटनेत सहा भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता आगामी जत्रेच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा (Goa) खंडपीठाने दिलेल्या कडक आदेशानंतर प्रशासनाने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिरगाव येथील ज्या असुरक्षित रस्त्यावर गेल्या वर्षी चेंगराचेंगरी झाली होती, त्या रस्त्याच्या कडेला असलेली सर्व अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम आजपासून राबवण्यात येत आहे.
सरकारच्या विशेष आदेशानुसार आणि मामलेदारांच्या प्रत्यक्ष निरीक्षणाखाली ही कारवाई सुरु करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या चौकशीत असे समोर आले होते की, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांमुळे भाविकांना चालण्यासाठी पुरेशी जागा उरली नव्हती. गर्दीचा ओघ वाढल्यानंतर रस्ता अरुंद झाल्याने गोंधळ उडाला आणि त्याचे रुपांतर मोठ्या चेंगराचेंगरीत झाले होते. हीच चूक पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. या कारवाई अंतर्गत रस्त्यालगतचे कच्चे-पक्के ओटे, पत्र्याची शेड आणि अनधिकृत दुकाने जेसीबीच्या साहाय्याने हटवली जात आहेत.
विशेष म्हणजे, हायकोर्टाने नुकताच राज्य सरकारला चेंगराचेंगरी रोखण्यासाठी 'क्राउड मॅनेजमेंट प्लॅन' सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्लॅनचाच एक भाग म्हणून रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मामलेदारांनी या कारवाईदरम्यान स्पष्ट केले की, 21 एप्रिल रोजी होणाऱ्या जत्रेसाठी भाविकांची ये-जा सुलभ व्हावी आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्या सहज पोहोचू शकतील, इतकी जागा मोकळी करणे हे प्रशासनाचे पहिले प्राधान्य आहे. अतिक्रमण धारकांकडून होणारा विरोध लक्षात घेता, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
शिरगावची जत्रा ही श्रद्धेचा विषय असली तरी, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, अशी भूमिका आता प्रशासनाने घेतली आहे. गेल्या वर्षी ज्या कुटुंबांनी आपले आप्त गमावले, त्यांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे यंदाची जत्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण आणि अडथळे दूर करणे अत्यंत आवश्यक होते. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे यंदा लईराईच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक सुरक्षित आणि मोकळ्या वातावरणात दर्शन घेता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत जत्रेच्या नियोजनासाठी आणखी काही कडक नियम लागू होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.