वास्को: ‘विकसित भारत संकल्पने’मुळे २०४७ म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दीवर्षात भारत एक सर्वश्रेष्ठ व शक्तिमान राष्ट्र होईल, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी येथे सोमवारी (ता.२२) गोवा शिपयार्डमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
गोवा शिपयार्डने बांधलेल्या दुसऱ्या फ्रिगेटच्या जलावतरण सोहळ्यात संजय सेठ बोलत होते. ‘तवास्य’ असे नामकरण करण्यात आलेल्या या फ्रिगेटचे जलावतरण नीता सेठ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मीलन पवार, राजेंद्र केरकर, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, पश्र्चिम नौदलाचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय सिंह, व्हाईस ॲडमिरल राजाराम स्वामीनाथन, खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, खासदार सदानंद शेट तानावडे, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर तसेच नौदल अधिकारी, गोवा शिपयार्डचे अधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.
नौदल व गोवा शिपयार्ड सतत ‘आत्मनिर्भर’साठी प्रयत्न करीत आहेत. हे फ्रिगेट नौदलासाठी २५ ते ३० वर्षे योगदान देईल, असे मंत्री सेठ म्हणाले.
येणाऱ्या पाच वर्षांत ६० युद्धनौका विविध ठिकाणी बांधण्यात येत आहेत. त्यापैकी नऊ गोवा शिपयार्डमध्ये बांधल्या जात आहेत. त्यामुळे जहाज आयात करण्याचे दिवस संपले असून आता देश त्यांची निर्यात करू लागला आहे. यासाठी २०२९ पर्यंत संरक्षण निर्यातीसाठी ५० हजार कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. युद्धनौका निर्यातीत जागतिक पातळीवर उदयास येण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.