पणजी: राज्यातील खराब आणि खड्डेमय रस्त्यांवरून आक्रमक झालेल्या आम आदमी पक्षाने (आप) ‘भाजपचे बुराक’ मोहीम राबवत आणि एक लाख जणांच्या सह्या घेत थेट मंत्रालय गाठून सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर केले. त्यावर, रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू असून, येत्या १५ दिवसांत ती पूर्ण केली जातील, अशी हमी मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यभरातील अनेक भागांतील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. काही ठिकाणचे रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. तर, काही भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खराब रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी करत आपने राज्यभर ‘भाजपचे बुराक’ मोहीम राबवत खराब रस्त्यांबाबत राज्यभरातील नागरिकांकडून सह्या घेण्यास सुरुवात केली.
त्यातच आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ नेत्या आतिषी आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी गोव्यात आल्याचा मुहूर्त साधत ‘आप’ ने सोमवारी पणजीत रॅली काढली आणि राज्य संयोजक अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगश, क्रूज सिल्वा यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी मंत्रालय गाठून एक लाख सह्यांचे निवेदन थेट मुख्यमंत्री सावंत यांना सादर केले.
राज्यभरातील रस्त्यांबाबत ‘आप’ने सादर केलेले निवेदन आपण स्वीकारले आहे. खराब झालेल्या रस्त्यांची कामे तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत ही सर्व कामे पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
कामत ‘नागरिकांना उत्तम रस्ते मिळावेत, हाच आपला प्रयत्न आहे. पावसाळ्यात तातडीने जिथे कामे केली होती, तेथे प्रामुख्याने रस्ते नादुरुस्त झाले आहेत. हॉटमिक्स प्लांट सुरू होताच राज्यात रस्ते सुधारण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल. संबंधित ठेकेदारांना तशा कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. दर्जेदार व पावसातही भक्कम राहतील, असे रस्ते उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, असे बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
पणजी : मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ढयांमुळे अपघात घडून अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. याबाबत सरकारला जागे करण्यासाठीच ‘आप’ने ‘भाजपचे बुराक’ मोहीम राबवल्याचे अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपच्या ‘भाजपचे बुराक’ मोहिमेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे एक लाख नागरिकांनी सह्यांसह आपापल्या भागातील रस्ते खराब असल्याची तक्रार केली. लोकांच्या तक्रारींची दखल घेत आम्ही निवेदनाद्वारे मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली. त्यावर सर्वच रस्त्यांची कामे येत्या चार दिवसांत सुरू करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पालेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.