Accident News Canva
गोवा

Goa Accident: चिंताजनक! गोव्‍यात रस्ते अपघातांत 60 युवकांचा बळी; सव्‍वाचार महिन्‍यांत एकूण 95 ठार

Goa Road Accident Death: जागतिक रस्‍ता सुरक्षा सप्‍ताह सुरू झाला असून त्‍यानिमित्ताने या वाढत्‍या अपघाती बळींवर नियंत्रण कसे आणता येईल याचा विचार सुरू झाला आहे.

Sameer Panditrao

मडगाव: १ जानेवारी ते ११ मे या एकूण १३१ दिवसांच्‍या कालावधीत गोव्‍यात रस्‍त्‍यांवरील अपघातात बळी गेलेल्‍यांची संख्‍या ९५ वर पोहोचली आहे. या अपघातांत जे बळी गेले आहेत त्‍यातील सर्वांत भयानक अशी गोष्‍ट म्‍हणजे, यातील ६० टक्‍के बळी २१ ते ४० या वयोगटातील आहेत आणि यातील बहुतेक बळी दुचाकीस्‍वार किंवा दुचाकीच्‍या मागे बसलेले स्‍वार यांचे आहेत. या वयोगटातील एकूण ६० व्‍यक्‍तींना मागच्‍या सव्‍वाचार महिन्‍यांत रस्‍ता अपघातात मरण आले आहे.

या लहानशा गोव्‍यात दर ३३व्‍या तासाला रस्‍ता अपघातात एक बळी जात असून ज्‍या गतीने हा आकडा वाढतो ते पाहून येत्‍या काही दिवसांत रस्‍त्‍यांवरील बळी शंभरी गाठतील, अशी भीती व्‍यक्‍त केली जात आहे.

आजपासून जागतिक रस्‍ता सुरक्षा सप्‍ताह सुरू झाला असून त्‍यानिमित्ताने या वाढत्‍या अपघाती बळींवर नियंत्रण कसे आणता येईल याचा विचार सुरू झाला आहे. मात्र, याबाबतीत फक्‍त वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिस यांनीच भर न घेता शिक्षण खाते, समाजकल्‍याण खाते आणि आरोग्‍य खाते या तीन खात्‍यांना सामावून घेऊन एक सर्वसमावेशक अशी उपाययोजना आखणे आवश्‍‍यक असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले जात आहे.

गोव्‍यात रस्‍ता वाहतुकीसंदर्भात जागृती कार्यक्रम हातात घेणाऱ्या गोवा कॅन या संघटनेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्‍स यांनी या परिस्‍थितीवर आपले मत व्‍यक्‍त करताना, गोवा राज्‍याचे एकूण आकारमान पाहिल्‍यास रस्‍त्‍यावर जाणाऱ्या बळींची संख्‍या चिंता करणारा विषय आहे. यातील ६० टक्‍के बळी हे २१ ते ४० या युवावर्गांचे असल्‍याने गोव्‍यासाठी निश्‍चितच ही चिंताजनक बाब आहे, असे ते म्‍हणाले.

या बळींवर कसे नियंत्रण आणावे यासाठी सर्व प्राधिकरणांनी एकत्र येऊन विचार करण्‍याची वेळ आली आहे. रस्‍त्‍यावर होणाऱ्या अपघातांकडे फक्‍त वाहतूक नियंत्रणाच्‍या दृष्‍टीतून न पाहता शिक्षण, आरोग्‍य आणि समाजकल्‍याण खात्‍यांकडूनही उपाययोजनेसाठी प्रयत्‍न व्‍हायला पाहिजेत.

अपघातात मृत्‍यू पावणारे जास्‍तीत जास्‍त तरुण वर्ग असल्‍याने या वर्गाला वाहतुकीची शिस्‍त लावण्‍यासाठी शिक्षण खात्‍याकडून महाविद्यालयीन विद्याार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे तर अपघातानंतर ज्‍या सामाजिक गुंतागुंतीचे परिणाम हाेतात त्‍यावर समाजकल्‍याण खात्‍याने उपाय करण्‍याची गरज मार्टिन्‍स यांनी व्‍यक्‍त केली.

१५ मे रोजी पाळणार ‘जागतिक कुटुंब दिन’

१५ मे रोजी ‘जागतिक कुटुंब दिन’ पाळला जात असून कुटुंबांना सामाजिक स्‍तरावर कशी मदत देता येणे शक्‍य आहे हे पाहिले जाते. अपघातात मृत पावल्‍यानंतर किंवा जबर जखमी झाल्‍यानंतर त्‍याचा संपूर्ण कुटुंबावर विपरित परिणाम होतो. अशा कुटुंबांना दिलासा देण्‍यासाठी काय करता येणे शक्‍य आहे, यावर त्‍या दिनाच्‍या निमित्ताने विचार केला जाईल, असे राेलंड मार्टिन्‍स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT