संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Robbery Crisis: पोलिस गस्तीमुळेच दरोडेखोरांचा डाव फसला, रिकाम्या हातांनी त्यांना परतावे लागले. पण, दरोडेखोरांची हिंमत इतकी वाढली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

शिशुपालाचे १०० अपराध भरले तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. मर्यादा संपते आणि अन्यायाचा वधकर्ता उभा राहतो, ही महाभारतामधील कथा सत्यात उतरत असेल तर गोव्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा वध व्हायलाच हवा. शिशुपालाची कथा उद्घृत करते की अपराधांची मर्यादा असते. पण आधुनिक समाजात सुदर्शन चक्र नव्हे तर कठोर कायदे, सक्षम पोलिसदल आणि उत्तरदायी शासन यांचे सु-दर्शन घडणे अपेक्षित आहे. तेच या अन्यायावर अंतिम उपाय आहेत. दरोड्यांच्या मालिकेत चावडी-काणकोण या महामार्गानजीकच्या ठिकाणाची भर पडणार होती.

पोलिस गस्तीमुळेच दरोडेखोरांचा डाव फसला, रिकाम्या हातांनी त्यांना परतावे लागले. पण, दरोडेखोरांची हिंमत इतकी वाढली आहे की पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली. ‘ते सापडलीत तेव्हा अशाच दगडांनी त्यांना हाणावे; फटके देत भर चौकातून त्यांची धिंड काढावी’, अशी तीव्र लोकभावना बनली आहे. अर्थात कायद्याच्या कक्षेत ते शक्य नाही. पण, उपद्रवामुळे अस्‍वस्‍थ भावनांचा तो उद्रेक आहे. मुरगाव पोलिस ठाण्यावर आलेल्या मोर्चातील प्रतिक्रिया अशाच बोलक्या आहेत.

Goa Crime
Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

आता संयमाचा अंत होतोय. दरोड्यांच्या सलगच्या घटना व त्यातील साम्य पाहता मोठ्या संख्येने लुटारू गोव्यात (Goa) आले आहेत, त्यांनी बस्तान मांडले आहे आणि त्यांची माहिती, क्षमता पोलिसांपेक्षा अधिक असल्याचे सकृतदर्शनी जाणवते. एका साध्या स्प्रेच्या साहाय्याने चावडीतील ज्वेलरी दुकानाचे सीसीटीव्ही निष्क्रिय करण्यात त्यांनी यश मिळवले, यावरून ते तांत्रिकदृष्ट्या किती प्रगत आणि प्रशिक्षित आहेत, हे स्पष्ट होते. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस रणनीती लागेल. अलीकडे पोलिस दलात मोठे फेरबदल झाले, त्यासोबत पोलिसांचे मनोबलही उंचावणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी बेतुलला पोलिसांना झालेली मारहाण आणि धाडस दुणावलेले दरोडेखोर हे विषण्ण करणारे चित्र आहे.

चावडी येथे गस्त होती आणि पोलिसांनी संशय येताच दुकानानजीक धाव घेतल्यानेच सराफी दुकानातील चोरी टळली. इथे गस्तीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पोलिसांवर भरपूर टीका झाली आहे. हीच वेळ आहे, पोलिसांनी आपले सत्त्व दाखवावे. दरोडेखोरांना पकडण्यासोबत त्यांना स्थानिक पातळीवर साह्य कसे मिळाले, त्यांची कार्यशैली कशी होती, ह्या तपासातून अनेक नवीन संदर्भ पुढे येतील, तेथे कारवाई करण्यासंदर्भात लागणारा कस महत्त्वाचा ठरेल.

चोर, दरोडेखोर प्रशिक्षित होत असतील व नवनव्या क्लृप्त्या वापरत असतील तर त्याचा डेटा तयार करून त्यावर उपाययोजना पोलिसांनी व्यावसायिक, लोक यांसमोर ठेवाव्या लागतील. चोरांच्याही दहा पावले पुढे राहावेच लागेल. यातूनच पोलिसांप्रति कमी झालेला विश्‍वास पुन्हा वाढेल. त्याहीपेक्षा जास्त त्याची जरब या दरोडेखोरांना व माहिती पुरवणाऱ्या त्यांच्या पाठीराख्यांना बसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com