पणजी: मॉन्सूनने माघार घेतली असली तरी, गोव्यात परतीच्या पावसाचा जोर वाढल्यामुळे दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. राज्य हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीचा दि वास जरी उत्साहात पार पडला असला तरी भाऊबीज, पाडवा आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोवा वेधशाळेने सोमवार (२१) आणि मंगळवार (२२) या महत्त्वाच्या दिवसांसह एकूण पाच दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. याची सुरुवात रविवार रात्रीच झाली, जेव्हा तिसवाडी, सत्तरी, सासष्टी, डिचोली आणि पेडणे या भागांत गडगडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची हालचाल विस्कळीत झाली आणि जनजीवन काही प्रमाणात प्रभावित झाले.
गोव्यात परतीच्या पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकरीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. सलग दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मये भागातील भातपीक पूर्णपणे आडवे झाले आहे. पीक काढणीच्या अगदी जवळ असताना आलेल्या या पावसामुळे, हातातोंडाशी आलेला भातपीक मातीत मिसळून पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर नुकसानीचे चित्र उभे राहिले असून, बळीराजा सध्या मोठ्या चिंतेत आहे.
काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने स्पष्ट केले होते की, दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपर्यंत राज्यात पावसाचा जोर दिसण्याची शक्यता होती . त्यामुळे, सणाची तयारी करणाऱ्या आणि विशेषतः बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी. परतीच्या पावसाचा हा अनपेक्षित मुक्काम गोव्याच्या उत्सवी वातावरणात थंडगार ओलावा घेऊन आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.