goa Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : काँग्रेसचा विजयी दावा; भाजप म्हणतोय, फायदा आम्हालाच

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, लोकसभा निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का आपल्याच बाजूने, असा दावा सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेसने आज केला.

राज्यात झालेले विक्रमी मतदान हे केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी झाले असे भाजपचे म्हणणे आहे, तर लोक सरकारच्या कारभाराला कंटाळले असून त्यांनी ही नाराजी मतदानातून व्यक्त केल्याचे कॉंग्रेसचे म्‍हणणे आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी आज राजकीय आरोप-प्रत्यारोपाला कारणीभूत ठरल्याचे दिसली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उत्तर गोव्यातील उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोव्यातील २० मतदारसंघांत भाजपला मताधिक्य मिळेल, असा दावा केला. सत्तरी व डिचोली तालुक्यात मिळूनच एक लाखांचे मताधिक्य मिळेल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की,

दक्षिण गोव्यातही ५० हजारांचे मताधिक्य मिळणार आहे. दक्षिण गोव्यातील सहा मतदारसंघांत भाजप मागे आहे. मात्र, ही पिछाडी सांगे, सावर्डे, काणकोण, फोंडा, शिरोडा व मडकई मतदारसंघांतील मताधिक्याने केवळ भरूनच निघेल.

राज्यातील मतदार सुशिक्षित, हुशार व सूज्ञ आहेत. ते जाती-धर्माच्या नावावर मतदान करत नाहीत. मी निवडणुकीच्या सुरवातीलाच मतदान ७५ टक्के वा त्याहून अधिक होईल, असे म्हटले होते. त्यानुसार विकासासाठी जनतेने हे मतदान केले आहे.

तानावडे म्हणाले की, वाढलेला टक्का हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने केलेल्या कामगिरीवरील शिक्कामोर्तब आहे. कॉंग्रेसने केवळ विरोधाचे, नकारात्मक राजकारण केले. आम्ही ३४ हजार ५०० पन्नाप्रमुख नेमले, त्यांची २३८ संमेलने घेतली. त्यांनी मतदारांना मतदानास उद्युक्त केले. त्यामुळे वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचे श्रेय आमचे आणि मतदानही आम्हालाच झाले आहे.

कॉंग्रेसचे अनेक मतदान केंद्रांवर बूथ लागू शकले नाहीत. कॉंग्रेसकडे मतदान केंद्रात बसण्यासाठी मतदान प्रतिनिधी नव्हते.

कॉंग्रेसच्या राज्यातील दयनीय स्थितीचे दर्शन मतदानादिवशी झाले. त्याचाही फटका कॉंग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही.

निकालापूर्वीच काँग्रेसने स्वीकारला पराभव : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होण्याआधीच कॉंग्रेसने उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांत पराभव मान्य केला आहे. खासगीत बोलताना ते हा पराभव मान्य करत आहेत, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. समाज माध्यमांवर नजर मारली तरी कॉंग्रेसने हा पराभव कसा मान्य केला आहे हे लक्षात येते, असे ते म्‍हणाले.

भाजपने लोकसभेच्या दोन्ही जागा आम्हीच जिंकू, असा दावा मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी केला. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक लाखांच्या मताधिक्याने तर दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे या ५०-६० हजारांच्या मताधिक्याने जिंकतील, असा पुनरूच्चार सावंत यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले, कॉंग्रेसवाल्यांनी मान्य केले आहे, की भाजप गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार आहे. त्यांनी खासगीत बोलताना तुम्ही दोन्ही जागा जिंकणार, असे सांगितले आहे. समाज माध्यमांवर कॉंग्रेस समर्थकांनी कॉंग्रेस आता चार मतदारसंघांपुरतीच मर्यादित राहिल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसपेक्षा प्रचारात इंडिया आघाडीचे घटक पक्ष आक्रमक होते, असेही निरीक्षण कॉंग्रेस समर्थकांनीच नोंदवले आहे.

तेच भांडणे करण्यासाठीही पुढे होते. त्यांनी ‘आम्हीच मूळचे कॉंग्रेसवाले’ असेही याखेपेला दाखवून दिले आहे. ते कोण ते मी सांगत नाही. आता निवडणुकीनंतर इंडिया आघाडी सगळे विसरून जाणार आहे. ‘आप’चे प्रमुख तुरुंगात आहेत. कॉंग्रेसने ही निवडणूक विकासाच्या नावावर लढविली नाही, तर जाती-धर्माच्या आधारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT