पणजी: राज्यात मागील तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडवून दिली असून अद्यापही त्याची तीव्रता कायम आहे. पडझड, नुकसानीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. पावसाची तीव्रता पुढील दोन-तीन दिवस वाढणार असल्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही वेधशाळेने केले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोवा आणि कोकणपट्टा ‘अलर्ट मोड’वर असून पुढील २४ तासांत राज्यात तब्बल ५० ते ७० किमी वेगाने वारे वाहत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनाऱ्यावर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सकाळी ८.३० वाजल्यापासून कायम आहे. ते येत्या २४ तासांत साधारणपणे उत्तरेच्या दिशेने सरकण्याची आणि त्याची त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील तीन दिवस पडणाऱ्या पावसाने जलस्रोतांमधील पाण्याचे प्रमाण वाढल्याने दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ॲग्ना क्लिटस यांनी दक्षिण गोव्यातील सर्व धबधबे, खाणीचे खंंदक, नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांमध्ये पोहण्यास किंवा त्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
ही बंदी ६० दिवसांसाठी असून अशा निर्बंधित जागेवर कुणी जात असतील तर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि तालुका मामलेदारांना सूचना केल्या आहेत. हा आदेश माेडणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या २२३ कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.
‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आर्थिक विकास महामंडळासोबत शनिवारी आयोजित केलेला ‘स्वयंपूर्ण गोवा’ संवाद कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कार्यक्रमाची नवी तारीख ठरवून लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.