वाळपई: गोवा–कर्नाटक जोडणारा चोर्ला घाट मार्ग सध्या अतिशय खराब अवस्थेत असून, रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा अक्षरशः जीव टांगणीला लागला आहे. कणकुंबी ते जांबोटीपर्यंतचा रस्ता खड्डेमय बनल्याने या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जिवावर उदार होऊन जाण्यासारखे झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी गोवा सरकारने कर्नाटक सरकारकडे ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
अलीकडील दिवसांपासून चोलाघाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, त्याचा परिणाम रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. पावसामुळे रस्त्यावरील डांबर निघून गेले असून, चोर्ला घाटातून बेळगावकडे जाताना विशेषतः कणकुंबीपर्यंतचा रस्ता अत्यंत बिकट झाला आहे. पुढे जांबोटीपर्यंत अधूनमधून खड्ड्यांची मालिकाच दिसते.
गोव्याच्या सीमेतून बाहेर पडल्यावर कर्नाटक हद्दीत चोर्ला ते कणकुंबी हा रस्ता जणू खड्ड्यांचा रस्ता बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हे ओळखणे अवघड झाले आहे. दुचाकी चालकांसाठी तर हा प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे.
रस्त्याची अशी दयनीय अवस्था असताना, “सबका साथ, सबका विकास” या संकल्पनेला साजेसा विकास या भागात होत आहे का, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. गोवा सरकारने या गंभीर स्थितीची दखल घेऊन कर्नाटक सरकारला तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पावले उचलण्यास भाग पाडावे, अशी मागणी होत आहे.
सध्या चोर्ला–कणकुंबी मार्गाने प्रवास करणे हे जीवघेणे ठरत असून, वाहतुकीदरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांचा त्रास अधिक वाढला आहे. या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीशिवाय नागरिकांना आणि वाहनचालकांना दिलासा मिळणे कठीण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.