पणजी: राज्यात वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांचा कल थंडावा देणाऱ्या रसाळ फळांकडे वाढला आहे. निर्जलीकरणाचा त्रास टाळण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात कलिंगड, शहाळे आणि लिंबू यांचा वापर करत असून वाढत्या मागणीमुळे त्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
सध्या बाजारात मध्यम आकाराचा लिंबू सुमारे ७ ते १० रुपयांना विकला जात आहे. तर वाट्याने घेतल्यास १०० रुपयांत १० ते १२ लिंबांचा वाटा मिळत आहे. कलिंगडाचा दर सुमारे ३० रुपये प्रति किलो असून स्थानिक कलिंगडांना अधिक मागणी दिसून येत आहे.
संत्री व मोसंबी गुणवत्तेनुसार १७० ते २२० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. शहाळ्याची किंमतही वाढली असून एक शहाळे ६० ते ८० रुपयांना विकले जात आहे. दरम्यान, उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाचा कडाका वाढल्याने घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागतात. त्यामुळे थंडावा मिळवण्यासाठी नागरिक लिंबू सरबत, शीतपेये तसेच विविध फळांचे शेक यांना पसंती देत आहेत. शहाळे पाणी आणि ऊसाचा रस यांनाही मोठी मागणी असून दुपारच्या वेळी अनेक ठिकाणी शेक व ज्यूस सेंटरवर मोठी गर्दी दिसून येत आहे.
फळांसोबतच उन्हाळ्यात काकडी आणि गाजरालाही चांगली मागणी आहे. काकडी सुमारे ४५ रुपये, तर गाजर ६० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. ग्रामीण भागात उपलब्ध होणारा रानमेवा तसेच निरालाही मागणी वाढली असून १०० ते १५० रुपये प्रति बाटली दराने विक्री होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.