Goa government metro budget updates
पणजी: राज्यातील शहरे आता मेट्रोने जोडण्याचा आराखडा राज्य सरकारने तयार केला आहे. त्यासाठी किमान पाच हजार कोटी रुपये खर्च येईल, अशी अपेक्षा आहे. कोकण रेल्वे महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची मागणी राज्य सरकारने केली आहे.
जैसलमेर येथे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत याचा आराखडा सादर करण्यात आला. वाहतुकीचा रस्त्यांवर येणारा ताण, रेंगाळलेला सागरमाला प्रकल्प यांमुळे मेट्रोच्या पर्यायावर विचार सुरू केला होता.
यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत याविषयी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण केले होते. त्यानंतर जैसलमेर येथे झालेल्या बैठकीतही सादरीकरण केले आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत हे मेट्रोचे जाळे विस्तारण्याची योजना असून तूर्त पेडणे रेल्वे स्थानक लोहमार्गाने विमानतळाला जोडण्याची मागणी केली आहे.
पणजी शहरासाठी तयार केलेल्या वाहतूक आराखड्यात मोनोरेलचा समावेश होता. तो प्रस्ताव आता मागे पडला असला तरी पणजी शहर इतर शहरांना मेट्रोने जोडण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मेट्रो ही खांबांवर उभारण्यात आलेल्या मार्गाने धावणार असल्याने भू-संपादनाची समस्या मोठ्या प्रमाणात उदभवणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाच्या समांतर असा मेट्रो मार्ग विकसित करून वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे.
मेट्रो स्थानकांपर्यंत पोचण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था करणे, मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची वाहने ठेवण्यासाठी प्रशस्त बहुमजली वाहनतळ विकसित करणे आदींचा समावेश या सरकारी प्रस्तावात केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, रस्ते वाहतूक कमालीची वाढली आहे. कृत्रिम प्रज्ञेवर चालणारी सिग्नल यंत्रणा उभारूनही वाहतूक कोंडीवर उपाय काढता आलेला नाही. त्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचाच विचार करावा लागणार आहे. यासाठी मेट्रोच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. पूर्वीच्या सरकारने मोनोरेल व मेट्रोचाही विचार केला होता, असे मला सांगण्यात आले. त्याचा पाठपुरावा केला गेला असता तर आज ही स्थिती उद्भवली नसती. भाजप सरकारने अटल सेतू, नव्या झुआरी पुलाचे काम केले, म्हणून आज वाहतुकीची तितकी समस्या जाणवत नाही.
सध्या जुने गोवे येथे रेल्वे स्थानक आहे; पण रेल्वेने पणजीतून तेथे जाता येत नाही. पणजीतून मडगावला मेट्रोने जायला मिळाले पाहिजे. दीर्घकालीन विचार करता मेट्रोची गोव्याला गरज आहे. त्यासाठी आता पणजी, मडगाव, फोंडा, म्हापसा ही शहरे एकमेकांना जोडणारी मेट्रो सुरू करावी, असा प्रस्ताव सादर केला आहे.
सरकारने सल्लागार नेमून या प्रकल्पाचा तपशीलवार आराखडा तयार केला आहे. सध्या सारे काही नियोजनाच्या पातळीवर असले तरी केंद्र सरकारने मदत करावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. येत्या आर्थिक वर्षात या प्रकल्पाची पूर्वतयारी जरी पूर्ण झाली तरी काही वर्षांत तो मार्गी लागेल. कुठून तरी सुरवात करावी लागते, ती अर्थसंकल्पपूर्व बैठकांत प्रस्ताव मांडून केली आहे.डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.