मडगाव: गोव्यातील मासेमारी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होत असला तरी बेतुल व मालीम जेटीवरून प्रत्यक्ष मासेमारीला काही दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे.समुद्र अद्याप खवळलेला असून स्थलांतरित कामगार पूर्णपणे परतले नसल्याने ट्रॉलरमालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ट्रॉलरमालक सावियो डिसिल्वा यांनी सांगितले की, हवामानात सुधारणा झाल्यास ३ किंवा ४ ऑगस्टपासून बहुतेक ट्रॉलर समुद्रात उतरण्याची शक्यता आहे. मालीम जेटीवरही बाहेरगावाहून येणाऱ्या कामगारांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असून त्यामुळे नांगरून ठेवलेल्या होड्या आणखी काही दिवस तरी किनाऱ्यावरच राहतील, असे चित्र आहे.
आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतरच मासेमारीला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बेतुल जेटीवर संरक्षक भिंत उभारण्याची मागणी ट्रॉलरमालकांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे. ट्रॉलरमालक वासुदेव केरकर यांनी सांगितले की, संरक्षक भिंत नसल्यामुळे बंदराच्या प्रवेशद्वाराजवळ भरती-ओहोटीच्या काळात अनेक मासेमारी बोटी अडकतात.
यामुळे मच्छीमारांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. मागील हंगामात अशा अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे भविष्यात अपघात टाळण्यासाठी आणि मासेमारी बोटींची सुरक्षित ये-जा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने संरक्षक भिंतीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.