डिचोली, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गोव्यातील बेरोजगार युवक-युवतींना खासगी क्षेत्रातील कंपनी आणि फार्मा कंपनीत रोजगार मिळत नाही.
जोपर्यंत सरकार नोकरभरतीची जुनी पद्धत अंमलात आणत नाही, तोपर्यंत बेरोजगारीची समस्या सुटणार नाही, असे मत कामगार नेते कृष्णा पळ यांनी व्यक्त केले आहे.
पूर्वी कोणत्याही खासगी क्षेत्रातील कंपनीत नोकरभरती करताना ती राज्य सरकारच्या रोजगारविनिमय केंद्रातून होत असे. पण आता तो कायदा मागच्या प्रत्येक सरकारने अंमलात आणला नसल्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्या सरकारला न जुमानता दुसऱ्या राज्यांतील कामगारांची भरती करतात. त्यामुळेच
गोव्यातील स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत. काही कंपन्यांचे अधिकारी सोशल मीडियावर जाहिरात देऊन नोकरभरती करतात. नोकरी देताना राज्याच्या बाहेर कुठेही बदलीवर जाण्यास तयार आहोत, असा कामगारांकडून करार करून घेतात. त्यामुळे गोव्यातील युवकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते, असे कृष्णा पळ यांनी म्हटले आहे.
रोजगारविनिमय केंद्रातील कार्डाची सक्ती हवी
जर सरकारला गोव्यातील युवकांना नोकरी द्यायचीच असेल, तर प्रत्येक खासगी क्षेत्रातील कंपनीत ती कायमस्वरूपाची द्यावी. तसेच कंपनीत किती कंत्राटी, किती गोव्यातील आणि किती परप्रांतीय कामगार आहेत, याची राज्य सरकारच्या कामगार व रोजगार खात्याने माहिती घ्यावी. खासगी कंपनीमध्ये नोकरभरती करताना प्रत्येक कामगाराला रोजगारविनिमय केंद्रातील कार्डाची सक्ती करावी. या केंद्रातून नावे मागावीत व त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवावे, असेही पळ यांनी म्हटले आहे.
गोव्यातील खासगी कंपन्यांनी नोकभरतीसाठी जाहिरात देताना त्यात अट घातली पाहिजे की कामगारांकडे गोवा रोजगारविनिमय केंद्राचे कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच कंपन्यांनी कामगारांची शैक्षणिक पात्रतेनुसार, पदांनुसार भरती करावी.
- कृष्णा पळ, कामगार नेते
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.