मडगाव: एल निनो प्रभाव आणि अन्य प्रकारामुळे पाऊस लांबणीवर गेला असताना त्याचा परिणाम राज्यातील जल साठ्यांवर दिसू लागला आहे. बहुतांश दक्षिण गोव्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली धरणात सध्या फक्त २८ टक्के पाणीच शिल्लक आहे. सध्या या जलाशयातील पाण्याची पातळी ३०.९ मीटर एवढी पोहोचली आहे.
दक्षिण गोव्यातील पंचवाडी धरणात तर केवळ २० टक्के पाणी उपलब्ध आहे. काणकोणमधील चापोली धरणात ४१ टक्के पाणी बाकी असून गावणे धरणात ४४ टक्के पाणी शिल्लक आहे.
जून मध्यावर येऊनही गोव्यात अजून पाऊस सुरू न झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे. आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या प्रमाणात ४५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी कमी होऊ लागले आहे. असे जरी असले तरी साळावली धरणात असलेले पाणी जून अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
वास्तविक साळावलीचे धरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे भरून वाहू लागते. जुलैमध्ये या धरणाची विहिर भरून ती ओसंडू लागते. मात्र यावर्षी पाऊसच न पडल्याने हे धरण काही प्रमाणात आटू लागले आहे. २०२३ सालीही अशीच परिस्थिती होती. त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा एकदा अशी परिस्थिती उद्भवल्याचे या सूत्रांनी सांगितले.
दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यातील स्थिती अधिकच चिंता करण्यासारखी असून सत्तरी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजुणे जलाशयात फक्त ११ टक्के पाणी बाकी असून या जलाशयातून केलेल्या पाणी पुरवठ्याला काही प्रमाणात दुर्गंधीही येऊ लागली आहे अशा तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत.
पेडणे आणि बार्देश तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तिळारी धरणात अजून ३१ टक्के पाणी बाकी आहे. गोव्यात मे ते जून या काळात जलाशयाची पाणी पातळी खाली जाते. जूनमध्ये वेळेवर पाऊस पडल्यास जुलैपर्यंत या धरणांतील पाणी वाढते. यंदा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली गेल्याने भविष्यात पाणीटंचाई भासू शकते, अशी शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.