पणजी: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी दूरदृष्टी ठेवून नवनवे प्रकल्प सुरू केले. परंतु, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या प्रकल्पांचे खासगीकरण करून ते उद्योगपतींच्या घशात घातले. भाजप सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या काळात देशाची अधोगती झालेली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
पं. नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात पाटकर बोलत होते. पं. नेहरू हे दूरदृष्टी असलेले नेते होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अमूल्य योगदान दिले. त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगातही जावे लागले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा देशात एक सुईसुद्धा तयार होत नव्हती. पंतप्रधान या नात्याने नेहरूंनी उद्योग व अन्य क्षेत्रांना चालना देणारे उपक्रम सुरू केले. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम स्थापन केले. आयआयएम, आयआयटी, ‘एम्स’सारख्या शिक्षण संस्था त्यांनी सुरू केल्या. परंतु, त्यातील अनेक संस्थांचे गेल्या बारा वर्षांत मोदी सरकारने खासगीकरण केलेले आहे, असे पाटकर म्हणाले.
विद्यमान भाजप (BJP) सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही. देशाचा विकास साधण्यात अपयश येत असल्याने प्रत्येक समस्येला हे सरकार पं. नेहरूंना जबाबदार धरत आहे. त्यामुळेच देश अधोगतीस चालला आहे. देशाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी नेहरूंच्या विचारांची नितांत गरज आहे, असेही अमित पाटकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.