पणजी: देशाचे व जनतेचे हित समोर ठेवून तसेच लोकांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी संविधानाची स्थापना झाली. काळ व वेळेनुसार गेल्या अनेक वर्षात त्यात दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत व त्याची गरजही होती. त्यामुळे देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढले तसेच गरिबीतून बाहेर येण्यास मदत झाली आहे.
मात्र, या दुरुस्त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य हिरावून घेणऱ्या नसाव्यात. गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी घटनेचे संरक्षण करण्याची गरज आहे, असे मत घटना तज्ज्ञ तसेच राजकारण विश्लेषक ॲड. क्लिओफात कुतिन्हो यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानाला ७५ वर्षे काल २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण झाल्याने त्यानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे देशभर संविधान रक्षक अभियान राज्यभर पुढील ६० दिवस राबवण्यात येणार आहे. यानिमित्त गोव्यातही काँग्रेस (Congress) प्रदेशातर्फे आजपासून हे अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन पणजीत दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार एल्टन डिकॉस्ता, पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रातील भाजप (BJP) सरकारने सत्तेवर येताच स्वतंत्र असलेल्या न्यायसंस्थाही त्यांच्या अधिकार कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो हाणून पाडला होता. सध्या पक्षांतर बंदी कायदा अधिक सक्षम करण्यासाठी दुरुस्तीची गरज आहे.
सभापती हे घटनेनुसार काम करत नाहीत. त्यांच्यासमोर असलेल्या कामकाजाला वेळेचे बंधन असायला हवे. हे सर्व अबाधित राहण्यासाठी संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सरकार करत असलेले कायदे व दुरुस्त्या या वाईट की फायदेशीर आहेत हे न्यायसंस्थाच ठरवू शकते त्यासाठी न्यायसंस्थेच स्वातंत्र्य अबाधित राहायला हवे. संविधान सुरक्षित राहिल्यासच गरीबी व श्रीमंतीमधील दरी कमी होऊ शकते,असे कुतिन्हो म्हणाले.
संविधान रक्षक अभियानसंदर्भात अधिक माहिती देताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, राज्यभर प्रत्येक मतदारसंघात संविधानमध्ये असलेल्या अधिकारांची तसेच राज्य सरकारकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची व त्याचे महत्व याची माहिती बैठका, काही जाहीर सभा तसेच दारोदारी भेट देऊन दिली जाणार आहे. ही अभियान मोहीम ऑफलाईन व ऑनलाईन चालविली जाणार आहे. राज्यातील सध्या सरकारविरोधातील धगधगत्या विषयांवरही या मोहिमेतून चर्चा केली जाणार आहे. राज्यात बेरोजगारी हा ज्वलंत विषय आहे. त्याचा अनेकांना फटका बसत आहे. रोजगार मिळवण्यासाठी युवांना पैसे मोजावे लागण्याची पाळी आली आहे, असा आरोप पाटकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.