पणजी: राज्यात पुढील वर्षी होणारी जनगणना ही दोन टप्प्यांत होणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या दरम्यानच्या ३० दिवसांत घरांची नोंद होणार आहे. त्यानंतर ९ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रत्यक्ष जनगणना होणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, सचिव आणि खातेप्रमुखांच्या उपस्थितीत जनगणना पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सचिवालयात आज बैठक घेण्यात आली.
त्या बैठकीला जनगणना संचालक चेष्टा यादव उपस्थित होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील जनगणनेनंतर राज्यात झालेले बदल या बैठकीत टिपण्यता आले. त्यात नवीन धारबांदोडा तालुक्याची निर्मिती, फोंडा तालुका दक्षिण गोवा जिल्ह्याला जोडणे आणि हरवळे पंचायतीची निर्मिती यांचा समावेश आहे.
त्यांनी सांगितले, की यंदा नागरिक स्वतःहून जनगणनेतील माहिती पोर्टलवर भरू शकतील. त्यानंतर जनगणना कर्मचारी त्यांच्या घरी आल्यास त्यांनी ती भरलेली माहिती त्याला दाखवल्यानंतर तो ती वैध ठरवणार आहे.
यंदा जनगणना ही पूर्णतः डिजीटल असेल. पुढील महिन्यात कोरगाव आणि मडगावच्या प्रभाग १६ मध्ये चाचणी जनगणना होणार आहे. प्रत्येक ठिकाणी १० मोबाईल्सचा वापर होणार आहे. दोन्ही ठिकाणी सातेक हजार जणांची गणना करावी लागेल असा अंदाज आहे. जनगणनेवेळी जातींची नोंद केली जाणार आहे.
देशात ब्रिटीशांनी १९३१ मध्ये जातनिहाय जनगणना केल्याची नोंद असली तरी राज्यात तशी जनगणना झाल्याच्या नोंदी नाहीत. यामुळे राज्यात कोणत्या जाती असतील त्यांची सूची केली जाणार आहे. त्यानुसार जनगणना ॲपमध्ये जाती नोंदवण्याची व्यवस्था असेल. अद्याप केंद्र सरकारकडून म्हणजेच जनगणना महासंचालनालयाकडून याबाबत स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणक अधिकारी म्हणून काम पाहतील असे आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.