पणजी: राज्यभरातील बोगस मतदारांची झाडाझडती मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेणे सुरू झाले आहे. कॉंग्रेसचे नेते जॉन नाथारेथ यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याने सांताक्रुझ मतदारसंघातील मेरशी येथे एकाच घरात नोंदलेल्या २८ मतदारांपैकी २६ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
संयुक्त मुख्य मतदार अधिकारी सुनील मसूरकर यांनी गोमन्तकला दिलेल्या माहितीनुसार, बोगस मतदार असतील त्याच्या तक्रारी जरूर कराव्यात. तक्रार करताना बोगस मतदाराविषयी माहिती तक्रारदाराने दिल्यास तपासकाम करता येते. नाझारेथ यांनी तक्रारीसोबत बोगस मतदारांची नावे असलेली मतदार यादी जोडली होती.
त्यामुळे पडताळणी करणे सोपे गेले. मोघम स्वरूपात तक्रार केल्यास चौकशी करणे कठीण होते. त्यामुळे नेमक्या माहितीसह तक्रार केल्यास बोगस मतदारांची नावे निश्चितच वगळली जातील. तक्रारदाराला जी नावे बोगस वाटतात ती असतीलच असे नव्हे.
त्यांनी सांगितले की, पणजीत नेपाळी मतदारांची नावे नोंदली अशी एक तक्रार आली आहे. त्याची चौकशी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना करण्यास सांगितली आहे.
त्या तक्रारीसोबत कोणते मतदार हे नेपाळी नागरिक असल्याचा संशय आहे त्यांची नावे मतदारयादीतील नोंदीनुसार दिली असती तर चौकशी करणे सोपे गेले असते. सरकारी यंत्रणा केवळ संशयावरून सर्वांचीच चौकशी करू शकत नाही. तक्रारदाराने तक्रार करण्यापूर्वी शहानिशा केल्यास कारवाई सुलभ होते.
मडकई मतदारसंघात एकाच घरात ८० जण नोंदले गेल्याचे प्रकरण मध्येच गाजले होते. त्याबाबत त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, त्याविषयी चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र त्यात स्पष्टता नसल्याने पुन्हा चौकशी अहवाल देण्यास सांगितले आहे. सेरावली येथे ८० मतदारांबाबतही आठवडाभराने अहवाल मिळणे अपेक्षित आहे.
गोवा राज्यात बोगस मतदारांची नोंद झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर राज्याचे मुख्य मतदार अधिकारी यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्र अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक घरातील मतदारांची यादी तपासली जात असून नव्याने नाव नोंदवले गेले असल्यास संबंधित व्यक्तीने दुसऱ्या ठिकाणची नोंद रद्द केली आहे का, याची खातरजमा केली जात आहे.
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पूरक मतदार यादीत राज्यभरात सुमारे २७,००० नवी नावे समाविष्ट करण्यात आली असून, १५,००० हून अधिक नावे वगळण्यात आली आहेत. या आकडेवारीत विसंगती असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंद झाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष तपास मोहीम सुरू केली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तक्रारींचा तपास पूर्ण झाल्यानंतर दुरुस्ती केलेली नवी मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.