पणजी: इयत्ता बारावीच्या निकालानंतर आता दहावीचे विद्यार्थी देखील निकालाच्या प्रतीक्षेत आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार बारावी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील यंदा लवकर जाहीर केला जाईल. एप्रिल महिन्याच्या मधल्या काळात निकाल जारी केला जाईल अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी माध्यमांना दिली आहे.
भगीरथ शेट्ये यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्यावर्षी १५ एप्रिल ते २० एप्रिल या काळात दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणपणे बारावीच्या निकालांनंतर दहावीचा निकाल जाहीर होतो.
यंदा बारावीच्या अंतिम परीक्षा लवकर झाल्या आणि निकाल देखील जाहीर करण्यात आले आहेत आणि यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा देखील निकाल जाहीर होईल. बारावीचा निकाल लवकर जारी करता यावा म्हणून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
मुलांना त्यांच्या पुढील शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी वेळ मिळावा आणि प्रवेश घेण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळावा म्हणून दहावीचा निकाल लवकर जाहीर करण्याचा विचार सुरु आहे. यंदा दहावीची परीक्षा १ मार्च ते २१ मार्चपर्यंत ३२ परीक्षा केंद्रांतून घेण्यात आली होती आणि या परीक्षेत एकूण १८,८७१ विद्यार्थी पहिल्याच वेळी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये ९,२९७ मुले, तर ९,५७४ मुलींचा समावेश होता. नवीन शिक्षण धोरणानुसार यंदाच्यावर्षी जून महिन्यात अकरावीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.