Govind Gaude: भोमवासीयांनी बगलमार्ग नेमका कुठून हवा ते आधी स्पष्ट करावे, असे आवाहन करताना एकत्र बसा आणि योग्य निर्णय घ्या, मी तुमच्याबरोबर आहे.
गावातील मंदिरांना आणि घरांना कोणताही धक्का लागणार नाही याची हमी मी देतो आणि गरज भासल्यास आंदोलनात तुमच्याबरोबर मी स्वतः उतरेन, अशी ग्वाही प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी भोमवासीयांना दिली.
भोम येथील नियोजित बगलमार्गासंबंधी चर्चा करण्यासाठी गोविंद गावडे यांनी आज ग्रामस्थांसोबत बैठक घेतली व संवाद साधला. तत्पूर्वी बहुतांश ग्रामस्थांनी काळे कपडे घालून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.
यावेळी भोम तसेच नागझर व इतर भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सातेरी देवस्थानच्या सभागृहात उपस्थित होते. गोविंद गावडे म्हणाले, की बऱ्याच लोकांना आपली घरे व जमीन जाणार असल्याची भीती वाटत आहे.
सरकारी अधिसूचनेत वर्तमानपत्रात जी नावे आली आहेत, त्यांची घरे जाणार असल्याचा चुकीचा समज पसरवण्यात आला असून अधिसूचनेत नाव येणे ही सरकारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मनातील भीती आधी काढून टाका.
भोम गावातील मंदिरांना आणि वारसा स्थळांना कुणीही बोट लावणार नाही याची हमी मी देतो, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
मागच्या काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तज्ज्ञ आले होते, पण लोकांनी त्यांचे काहीच ऐकून घेतले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना बोलावून नेमकी वस्तुस्थिती काय आहे यासंबंधीची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी धीर धरावा, असे आवाहन गोविंद गावडे यांनी केले.
ग्रामस्थांच्यावतीने संजय नाईक व सप्तेश नाईक यांनी बगलमार्गासंबंधी विचार मांडले. सुरवातीला एका ग्रामस्थाने या आंदोलनात बाहेरील व्यक्तीचा सहभाग का? असा सवाल करताच आंदोलनकर्ते भडकले. त्यानंतर एकमेकांची समजूत काढून बैठक सुरू झाली.
यावेळी काही ग्रामस्थांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. मुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊ आणि काही शंका असल्यास त्यांचे तेथेच निरसन करू, असे गोविंद गावडे यांनी सांगितले.
‘...तर मी स्वतः आंदोलनात’
बगलमार्गात नागरिकांच्या जमिनी जात असतील, तर मी स्वतः आंदोलनात उतरेन, असे गोविंद गावडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. सरकारचे नियोजन काय आहे, त्यासाठी येत्या २५ तारखेला या आराखड्यासंबंधी योग्य आणि सविस्तर माहिती देण्यात येणार आहे, ही माहिती ग्रामस्थांनी जाणून घ्यावी, असे आवाहनही गोविंद गावडे यांनी केले.
काय ते लेखी द्या....
सरकारने भोमच्या नागरिकांना बगल मार्गासंबंधी काय ते लेखी द्यायला हवे, असे ग्रामस्थांनी सांगितले. केवळ बैठका घेऊन चालणार नाही, बैठका घेतल्यानंतर उद्या सरकार शब्द फिरवू शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्रकरण न्यायालयात
भोम गावातून जात असलेल्या नियोजित बगलमार्गाला ग्रामस्थांनी ठाम विरोध केला असून यासंबंधी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. येत्या २३ रोजी त्यासंबंधीची सुनावणी होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.