पणजी: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर कासवांची पिल्ले बाहेर पडताना पाहून प्रसिद्ध अभिनेत्री झिनत अमान भावूक झाल्या असून त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पर्यावरण रक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी फुटून शेकडो पिल्ले बाहेर येत असल्याचा अनुभव झिनत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. काही आठवड्यांपूर्वी मादी कासवांनी वाळूत अंडी घातली होती आणि आता ती पिल्ले समुद्राकडे धाव घेत असल्याचे त्यांनी वर्णन केले.
हा निसर्गाचा ‘अद्भुत आणि शांत चमत्कार’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही पिल्ले समुद्राकडे मार्गक्रमण करत होती. मात्र, या पिल्लांपैकी अत्यल्प, सुमारे हजारात एकच पिल्लू मोठे होऊन जगते, असेही त्यांनी नमूद केले. मोठे झाल्यानंतरही त्यांना प्रदूषण, मासेमारीतील जाळे, किनाऱ्याचे धूप आणि पर्यावरणीय संकटांचा सामना करावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या अनुभवामुळे त्या भावूक झाल्या असून, निसर्गाशी असलेले नाते जपल्यासच माणुसकी टिकून राहू शकते, असे त्यांनी म्हटले. त्याच वेळी गोव्यातील नद्या आणि समुद्राचे पाणी प्रदूषित होत असून, काही ठिकाणी ते पोहण्यासाठी आणि मासेमारीसाठीही अयोग्य झाले असल्याची खंत झिनत यांनी व्यक्त केली.
अभिनेत्री झिनत यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आवाहन करताना म्हटले आहे की, गोव्यातील पर्यावरणीय हानीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर ‘स्वर्गासारखा गोवा नष्ट होण्याचा धोका आहे. निसर्गसंपन्नतेने भरलेल्या या गोव्याकडे आता पर्यावरणीय दृष्टीकोनातून अधिक लक्ष देण्याची वेळ आली अाहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.