पणजी: राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपासून कोणतेही पूर्वनियोजन न करता आल्तिनो-पणजी येथील सरकारी निवासस्थानांचे सरकारी कार्यालयांमध्ये रूपांतरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची कुटुंबे धास्तावली असून, कर्मचाऱ्यांपेक्षा सरकारी कार्यालयांना सरकारकडून अधिक प्राधान्य का दिले जात आहे, असा सवालही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
सरकारी खात्यांमध्ये कार्यरत असलेल्या राज्यभरातील गरजू कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आल्तिनो, सांतइनेज तसेच पाटो या भागांमध्ये निवासी इमारती उभ्या केल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत पणजी परिसरातच रहावे, कामावर वेळेत दाखल व्हावे, या उद्देशाने त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे.
परंतु, सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधलेल्या इमारतींमधील रिक्त फ्लॅटमध्ये गेल्या काही वर्षांपासून कोणतेही पूर्वनियोजन न करता सरकारी कार्यालयांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. यात काही फ्लॅट सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यास नकार देऊन त्यात सरकारी कार्यालयांचा कारभार थाटण्यात येत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री, मंत्री, सचिवांच्या निवासामुळे आल्तिनो हा पणजीतील सर्वांत सुरक्षित परिसर मानला जातो. परंतु, तेथील सरकारी निवासस्थानांच्या इमारतींमध्ये सरकारी कार्यालयांचे स्थलांतरण होत असल्यापासून स्थानिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या भागात सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुरुष कर्मचाऱ्यांची गर्दी, त्यांच्याकडून होणारे धूम्रपान, रात्री अज्ञात पुरुषांचे येणे-जाणे यांमुळे या भागात चोऱ्या, महिलांचे छळ आदींसारख्या गंभीर घटना वाढीस लागण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.