Shiv Jayanti Goa | Raju Nayak Dainik Gomantak
गोवा

राज्यहितार्थ प्रत्येक युवकाने ‘शिवाजी’ बनावे : राजू नायक

श्री मल्लिकार्जुन व चेतन मंजू देसाई महाविद्यालयात शिवजयंती; मान्यवरांना पुरस्कार

दैनिक गोमन्तक

‘‘गोव्‍यात सध्‍या राजकीयदृष्ट्या अवनती सुरू आहे. पर्यटन क्षेत्रातील बजबजपुरी, खाण व्यवसायातील गैरकारभार, ‘म्हादई’चे हरण, कॅसिनो संस्कृतीचा वेढा, गुदमरलेली राजधानी पाहिल्‍यास चिंता वाटते. म्‍हणूनच नागरी सुराज्‍यासाठी पुढील दहा वर्षांत प्रत्येक युवकाने आचरणाने ‘शिवाजी’ बनणे गरजेचे आहे’’, असे प्रतिपादन ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.

येथील श्री मल्लिकार्जुन व चेतन मंजू देसाई महाविद्यालयात रविवारी शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी या नात्‍याने ते बोलत होते. व्‍यासपीठावर ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन मंजू देसाई, उपाध्यक्ष के. बी. गावकर, सचिव मंजूनाथ देसाई, राजेंद्र देसाई, ‘ज्ञान प्रबोधिनी’चे अन्य विश्वस्त, प्राचार्य डॉ. मनोज कामत, प्रमुख वक्‍ते प्रा. श्रीकृष्ण अडसूळ उपस्थित होते.

या प्रसंगी नायक यांनी इतिहासाचे दाखल देत उपस्‍थितांचे वर्तमानाकडे लक्ष वेधले. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज काळात मरगळलेल्या गोमंतकीय जनतेमध्‍ये नवचेतना जागवण्यासाठी सप्तकोटेश्वर देवालयाची पुनर्बांधणी केली. त्यामागे धार्मिक हेतू मुळीच नव्हता. तत्कालीन परिस्थितीला अनुसरून ते एक राजकीय परिमार्जन होते’’, असे अभ्‍यासपूर्ण निरीक्षणही त्‍यांनी नोंदवले.

‘‘गोव्‍यात राजकीय, सामाजिक परिवर्तन घडणे आवश्‍‍यक असून, त्‍यासाठी युवकांना ‘आत्‍ममग्न’ अवस्‍थेतून बाहेर काढणे गरजेचे आहे. घोंघावणाऱ्या संकटांना सामोरे

जाण्‍याचे, अपप्रवृत्तींना रोखण्‍याचे सामर्थ्य केवळ युवा शक्तीच्या मनगटात आहे. मात्र, सध्‍या ही शक्ती ‘थंड’ आहे’’, अशी खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. या वेळी सहा मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. रूपा च्यारी व श्रिया टेंगसे यांनी केले. चेतन देसाई यांनी आभार मानले.

...म्‍हणून छत्रपती युगपुरुष : प्रा. अडसूळ

कार्यक्रमात प्रमुख वक्‍ते प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांनी ‘समकालीन युगातील छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर ओघवत्‍या शैलीत भाष्‍य केले. ते म्‍हणाले,

  • छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते, हे साऱ्या जगाने मान्‍य केले आहे. त्यामुळेच रशिया, अमेरिका व अन्य देशांच्या विद्यापीठातून छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्‍यास करण्‍यासाठी स्वतंत्र पीठासनाची निर्मिती करण्यात आली आहे.

  • छत्रपतींनी जगाला अव्‍वल जलनीती, अर्थनीती, स्थापत्यशास्त्र, गनिमीकावा, सागरी शक्ती या विषयाचे ज्ञान दिले, जे अत्‍यंत मौलिक आहे आणि त्‍यावर जगभर अध्ययन सुरू आहे.

  • छत्रपतींनी उभारलेला प्रत्येक किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. उंचावरील प्रत्येक किल्ल्यावर बारमाही पाण्याचे साठे निर्माण करून उत्कृष्ट जलनीतीचे आदर्श उदाहरण जगासमोर ठेवले.

  • महाराजांवर जिजाऊ मातेने संस्कार केले. ज्या मुलांवर मातृसंस्कार चांगले होतात, ती मुले जगाला गवसणी घालतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जीवनपटातून उद्धृत होते.

  • महाराजांनी सुरतेची लूट केली हे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी तेथील धनाचा विनियोग जनतेच्या कल्याणासाठी केला’’, असेही अडसूळ म्‍हणाले.

  • यावेळी श्री मल्लिकार्जुन व चेतन मंजू देसाई महाविद्यालयाने इतिहासकार स. शं. देसाई यांच्या नावे छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासण्यासाठी स्वतंत्र पीठासन सुरू करण्याची सूचना प्रा. अडसूळ यांनी केली.

प्रभावी व्‍यक्‍तिमत्त्वांना पुरस्‍कार

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या छत्रपतींच्‍या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे संस्थापक सदस्य कै. डॉ. जिबलो नाईक गावकर स्मृति पुरस्कार दाद देसाई, कै. जयसिंगराव राणे स्मृति पुरस्कार गुरू कोमरपंत यांना, कै. डॉ. पुंडलिक गायतोंडे स्मृति पुरस्कार ज्योती कुंकळ्येकर यांना; तेरेखोलचे वीर कै. आल्‍फ्रेड आल्फान्सो स्मृति पुरस्कार जे. पी. मार्टिन्स यांना; कै. आशालता वाबगावकर स्मृति पुरस्कार इंदुमती म्हाळशी यांना; तर कै. सीताराम टेंग्से स्मृति पुरस्कार पांडुरंग फुग्रो यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी राजू नायक व प्रा. अडसूळ यांचाही गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT