विजय देसाई
चांगले शिक्षण घ्याल तर आपल्याला उज्ज्वल भवितव्य लाभेल, ही शिकवण आपण मुलांना देत आलो असलो तरी, उच्चशिक्षण घेऊनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत म्हणून आजचा शिक्षित तरुणवर्ग निराशेच्या खाईत सापडला आहे. अथक मेहनत करून उच्चशिक्षण घेऊन आजचा युवक ज्ञानार्थी बनला मात्र शिक्षण पदरी असूनही युवक पोटार्थी मात्र बनू शकला नाही हेच आपल्या शिक्षणव्यवस्थेचे दुर्दैव.
आज राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. काही राज्यांनी नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणीही केली आहे. असे असले तरी शिकून पदव्या घेतल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न आजच्या युवावर्गाला सतावत आहे.
आज आपल्या राज्यातील बेरोजगारांचा आकडा भयावह आहे. दहावी बारावी उत्तीर्ण हजारो आहेत. चिंतेची बाब म्हणजे उच्चशिक्षित व व्यावसायिक पदवीधर आणि पोस्टग्रॅज्युएट ही मोठ्या संख्येने बेरोजगार आहेत. या बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्यामुळे उच्च शिक्षण पदरी असूनही काही युवक लहानसहान नोकरी पकडून आपल्या नशिबाला दोष देत नैराश्येच्या भावनेत जीवनाचा गाडा ढकलताना दिसतात.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध अभियांत्रिकी शाखेत सुमार अडीच हजार जागा आहेत. म्हणजे प्रतिवर्षी गोव्यात अडीच हजार अभियंते पदवी घेऊन बाहेर पडतात. त्याशिवाय एनआयटी व आयआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून आणखी अभियंते बाहेर पडतात. त्यात भर म्हणून राज्या बाहेरील अभियांत्रीकी महाविद्यालयात शिकणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यात सुमार हजारभर डिप्लोमाधारक अभियंते प्रतिवर्ष तयार होतात.
आता या सगळ्यांना नोकरी मिळणे शक्य आहे का? बिलकुल नाही! म्हणूनच अभियांत्रीकी पदवी घेतलेले विद्यार्थी खासगी कंपनीत वीस पंचवीस हजारांच्या वेतनावर काम करतात. तर काही सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत व्यावसायिक शिक्षक म्हणून वीस हजारांच्या वेतनावर कंत्राटी पद्धतीने कामे करतात.
राज्यात प्रतिवर्षी हजारभर बीएड शिक्षक व पाचशेच्या आसपास डीएड शिक्षक पदवी घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत राहतात. मात्र शिक्षकाच्या नोकऱ्या तयार होतात दोनशे. शिक्षक आहेत दोन हजार. मग प्रति वर्षी जवळजवळ दीड हजार बेरोजगार शिक्षक बेरोजगारांचा आकडा फुगवित असतात. त्याशिवाय कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी घेतलेले हजारो पदवीधर बेरोजगार आहेत. उच्चशिक्षित बेरोजगारांची ही संख्या तीन लाखांच्यावर असण्याची शक्यता आहे.
पूर्णवेळ नोकरी नाही म्हणून काही शिक्षक कंत्राटी पद्धतीवर व लेक्चरबेसिसवर काम करताना दिसतात. तीच स्थिती फार्मसी, अभियांत्रिकी या शाखेत पदवी घेतलेल्या युवकांची झाली आहे. एका रिक्त जागेवर शेकडो बेरोजगार अर्ज करतात मात्र नोकरी मिळते एकट्यालाच. तीही त्याच्या गुणवत्तेवर नाही, तर राजकीय वरदहस्तावर.
या एवढ्या मोठ्या बेरोजगारांच्या फौजेचे करणार काय? हा प्रश्न आहे. काही शारीरिक शिक्षकांना सरकारने कंत्राटी पद्धतीवर नेमले होते. मात्र काही जणांचे वय उलटून गेल्यामुळे त्यांची स्थिती नाजूक बनली आहे. त्यांना नोकरी सोडावी लागणार आहे.
सरकारने या गंभीर समस्येवर चर्चा करण्याची गरज आहे. शिक्षण खात्याचा भार मुख्यमंत्र्यांकडे आहे. आपल्या राज्याला ‘शिक्षण हब’ बनविण्यासाठी मुख्यमंत्री धडपडत आहेत.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित तयार होतात, मात्र उच्चशिक्षितांना रोजगार उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.