Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: 'टाईमबॉम्ब'

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘स्मार्ट सिटी पणजी’च्या कामात कमालीचा नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले असून मॉन्सूनच्या तोंडावरही अत्यंत धोकादायक कामे सुरूच आहेत.

सांतिनेज परिसरात अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये सांडपाणी साचले असून भयंकर दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम डासांचा प्रादुर्भावात होत असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ही कामे येत्या दोन - चार दिवसांत पूर्ण झाली नाहीत, तर हे टाईमबॉम्ब बनलेले काम सरकारसाठी डोकेदुखी बनणार आहे. पावसाळ्यात त्याचा स्फोट होऊन लोक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटी पणजीच्या कामांतर्गत विविध विभागांची कामे एकाचवेळी सुरू करण्यात आली. यात सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते, कचरा व्यवस्थापन व सांडपाणी निचरा विभाग आणि ‘जीसुडा’च्या कामांचा अंतर्भाव आहे.

या कामांमध्ये कमालीचा नियोजनाचा अभाव होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या कामांना सप्टेंबर महिन्यापासून वेग आला. मात्र, कंत्राटदार आणि सरकारी खाते यांच्यात योग्य समन्वय नसल्याने अनेक कामे रेंगाळत राहिली.

पावसाळा तोंडावर आल्याने लोकांमधून या कामांच्या विरोधात तीव्र भावना उमटू लागल्या. याची दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना घ्यावी लागली.

अखेर मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीच्या सर्व कामांची जबाबदारी राज्याचे वरिष्ठ सचिव संजीत रॉड्रिग्स यांच्यावर सोपवली आणि ही सर्व कामे आहे त्या स्थितीत थांबवून रस्त्याच्या डांबरीकरणाचे आदेश दिले.

ही प्रक्रिया सुरू असली, तरी सांडपाणी निचरा आणि कचरा व्यवस्थापनाची कामे कंत्राटदाराला वेळेवर करता आलीच नाहीत. याचा परिणाम ठिकठिकाणी खोदलेले मोठे खड्डे, त्यात साचलेले सांडपाणी, डासांचा प्रादुर्भाव आणि नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य असा झाला आहे. काही दिवसांत पाऊस पडू लागला, तर सांतिनेज परिसरासह पणजी शहर तुंबण्याची भीती कायम आहे.

लोकांनी मांडली माझ्याकडे कैफियत

स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांविषयी, खासकरून सांतिनेज येथील परिसरातील मलनिस्सारणाच्या कामाबद्दल उत्पल पर्रीकर म्हणाले की, या गलथानपणाबद्दल आता माझ्याकडे लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

लोक मला या गचाळ कामांचे फोटो पाठवत आहेत. सुरुवातीपासूनच या कामाचे नियोजन व्यवस्थित झालेले नाही. आता तरी पावसाळा उंबरठ्यावर आला आहे. पावसाळ्यात या भागाचे काय हाल होतील, हे समजणे कठीण आहे.

पणजीतील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या या अनागोंदी कारभारास स्थानिक आमदारच कारणीभूत असून त्यांनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि घरी बसावे. या कामांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी मांडल्या आहेत.

- उत्पल पर्रीकर.

महापौरांचा दावा फोल

काही दिवसांपूर्वी महापौर रोहित मोन्सेरात यांनी ही सर्व कामे वेळेत म्हणजे पावसाळ्याअगोदर पूर्ण होतील, असा दावा केला होता. आता ही कामे पूर्ण होणे बाजूलाच राहिले. सध्या सुरू असलेली कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे महापौरांचे दावे फोल ठरले आहेत, असेही उत्पल म्हणाले.

स्मार्ट सिटीची कामे अनेक दिवस सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ, मशीनची घरघर आम्ही गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ अनुभवत आहोत. या धुळीमुळे घरात राहणे मुश्‍कील झाले आहे. आता घरासमोर मलनिस्सारणाचे पाणी वाहत आहे. त्याची दुर्गंधी आणि त्यावर घोंघावणारे डास यांमुळे आम्ही मेटाकुटीस आलो आहोत.

- शोभा लाड, गृहिणी, सांतिनेज.

रॉड्रिग्स आले, नियोजन कुठे? : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कामांमधील नियोजनाचा अभाव आणि भोंगळपणा मान्य करून सरकारमधील वरिष्ठ सचिव संजीत रॉड्रिग्स यांना या स्मार्ट सिटीच्या सीईओपदी बसवले खरे, परंतु रॉड्रिग्स यांचे नियोजन आतापर्यंत प्रत्यक्षात दिसत नाही. स्मार्ट सिटीची कामे तशीच रेंगाळलेली असून त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो, अशी भीती उत्पल यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT