रावण गावातील मंदीर
रावण गावातील मंदीर Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील चार वाड्याचं 'रावण' गाव; सांस्कृतिक वैभवाचा जपला वारसा

Dashrath Morajkar

पर्ये: महाराष्ट्राच्या सीमेवर (Sattari) वसलेले सत्तरी तालुक्‍यातील रावण गाव हा कृषी (Agriculture) संस्कृती जोपासणारा आहे. गावात असलेल्या डोंगर टेकड्या व त्या टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले भातशेतीचे मळे यामुळे हा गाव समृद्ध आहे. एकाबाजूने या परिसरात जंगली जनावरांचा हैदोस होत असताना देखील येथील कष्टकरी लोक भातशेती पिकवतात हे विशेष. तसेच इथल्या डोंगर पठारावर काजू लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने काजू हे आर्थिक उत्पन्न देणारे मुख्‍य पीक आहे. अंजुणे धरणाचा कालवा या गावातून गेल्याने शेती, बागायतीमध्‍ये हा गाव ‘सुजलाम सुफलाम’ आहे. त्यामुळे येथे माड-पोफळीची लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. (Do you know about Ravana Village in Goa?)

रावण गावाला सांस्कृतिक वैभवाची विशेष परंपरा लाभली आहे. गावात सातेरी केळबायच्‍या मुख्य मंदिरासह महादेवाचे मंदिर आहे. त्या व्यतिरिक्त चव्हाटेश्‍वर, गोठणेश्वर आदी देवस्थाने आहेत. शिगमोत्सव हा गावाचा सर्वांत मोठा उत्सव. सात दिवस चालणाऱ्या शिगमोत्सवात करवली उत्सव, घोडेमोडणी आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात.

रावण गावात एकूण चार वाडे आहे. यापैकी वरचावाडा, मधलावाडा व पलतडवाडा हे एकमेकांना लागून आहे तर पेळावदा हा वाडा गावाच्‍या दुसऱ्या बाजूला मोर्ले गावाला लागून आहे. रावण महसुली गावामध्ये अंजुणे धरणाचा बुडीत क्षेत्रातील ‘केळावडे’ हा गाव रावण येथे पुनर्वसित केला आहे व तो ‘रावण कॉलनी’ या नावाने ओळखला जातो.

गाव आणि रावण...

या गावाला रावण नाव कसे पडले याबद्दल ठोस माहिती उपलब्‍ध नाही. रामायणात रावण हा लंकानगरीचा राजा होता. या रावणाचा आणि या गावाचा तसा काही संबंध नाही. पण गावातील महादेवाच्या मंदिरात एक विशिष्ट शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या योगीपीठावर 32 नागांची चित्रे कोरलेली आहेत. रावण हा शिवभक्त होता आणि येथील हे वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग या रावणाशी संबंधित आहे, असाही एक मतप्रवाह आहे. पण दुसऱ्या बाजूने मात्र रावण गाव लहान-मोठ्या डोंगरांनी वेढलेला आहे. या डोंगरावर पूर्णपणे वनराजी आहे. मोठ्या वनातील गाव म्हणून ‘रावण’ असा दुसरा मतप्रवाह आहे. पण नक्की या गावला नाव रावण कसे पडले हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. गोव्यात मडगाव भागात रावणफोंड आणि सांगे व काणकोण तालुक्याच्या सीमेवर असलेला रावण डोंगर आहे. पण या दोन्ही ठिकाणांचा या गावाशी काही संबंध नाही.

250 घरे, सुमारे 1200 लोकसंख्‍या : गावाला पर्ये, मोर्ले व घोटेली या गावांच्या सीमा जुळलेल्या आहे तर दुसऱ्या बाजूने आयी व तळेखोल या महाराष्ट्राच्या गावांच्या सीमा लागलेल्या आहेत. 554 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या गावात सुमारे 250 घरे व लोकसंख्या 1200च्या आसपास आहे. गावातील अळमो हा मुख्य डोंगर आहे. त्याचबरोबर इतर लहान मोठी पठारे आहेत. देवसाची शेत, करमळीचे शेत, दाबे हरलाचे शेत, माणूक तळ्याचे शेत आहे. इथले कष्टकरी लोक ही शेते पिकवतात, पण ‘मोकाशेशाही’ची दृष्ट या गावाला लागल्याने गावातील बहुतेक जमिनींची मालकी येथील कष्टकरी जनतेकडे नाही ही मोठी शोकांतिका आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT