Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सत्ताधारी तंबूत अस्वस्थता

दैनिक गोमन्तक

Goa Politics: विधानसभेत 33 जणांचे बहुमत असतानाही भाजप मंत्रिमंडळातील एका बदलामुळे सत्ताधारी गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि सभापती रमेश तवडकर यांनी सारवासारव करताना मंत्रिमंडळात आणखी बदल होणार नाहीत, असे सांगणे सुरू केले आहे.

या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी थेट भाष्य कऱणे टाळले आहे. नीलेश काब्राल यांना राजीनामा देण्यास सांगण्यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी, जेव्हा तसा निर्णय होईल तेव्हा कळवू, असे कोरडेपणाने सांगितले होते.

कूळ-मुंडकार खटले निकाली काढण्यासाठी शनिवारी उपजिल्हाधिकारी व मामलेदारांची न्यायालये खुली ठेवणे, मये येथील स्थलांतरितांच्या

मालमत्तेतील जमीन कसवटदारांना आणि तेथे घर बांधून राहिलेल्यांना जमिनीची मालकी देणे, तुये येथील इलेक्ट्रॉनिक्स सिटीमधील भूखंडवाटपाला गती देणे अशा अनेक गोष्टींना सरकार चालना देऊ लागले आहे. राजकीय अस्थिरतेची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्या चर्चेचा रोख सरकारच्या चांगल्या कामांकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

त्याचमुळे मंत्रिमंडळाविषयी कोणताही प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवणाऱ्या तानावडे यांनी मंत्रिमंडळ बदल होणार नाही, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्याहीपुढे जात सभापतींनी मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी भाष्य करत भाजपने राज्य सरकारची छबी बिघडू नये, यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना उघडपणे साथ देणे पसंत केले आहे.

काब्राल यांना मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर आणखी कोणाला वगळले जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याविषयी जनतेला उत्सुकता होती आणि सत्ताधारी वर्तुळात त्याविषयी अस्वस्थता होती.

सुरवातीला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून काब्राल यांच्यविषयी अनुचित निर्णय होणार नाही, असे सांगून मंत्री-आमदारांना आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर दिल्लीतून काब्राल यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील अदृश्य शक्ती हीच राज्य सरकारचा कारभार चालवते, हे मंत्री-आमदारांना पुरते कळून चुकले आहे. त्यामुळे धास्तावलेल्यांना आणखी कोणा कोणाला वगळले जाणार, याविषयी चाललेल्या चर्चेचीही भीती वाटू लागली आहे.

मंत्रिमंडळात आणखी बदल नाहीत : भाजप नेत्यांचे सूतोवाच

आपण नजरेत येऊ, या भीतीने सत्ताधारी वर्तुळातील मंत्री-आमदार कोणत्याही सार्वजनिक वा खासगी ठिकाणी एकत्र येण्याचे टाळत होते. ते एकमेकांशी मोबाईलवर संपर्कात राहून बदलत्या राजकीय स्थितीचा अंदाज घेत होते. सत्ताधारी गोटातील ही अस्वस्थता स्थानिक नेतृत्वाच्या लक्षात आली. त्याचमुळे एका दिवसासाठी तरी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी हैदराबाद येथील तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील प्रचार सोडून गोव्यात यावे, असे नियोजन करण्यात आले. त्यांनी आल्या आल्याच मंत्रिमंडळात आणखी फेरबदल होणार नाहीत, असे सांगून विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

संकल्पचे पुनर्वसन कधी?

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी भाजप सरकारने दिलेले कोणत्याही महामंडळाचे अध्यक्षपद अद्याप स्वीकारलेले नाही. त्यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांना भाजप प्रवेशावेळी मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्ती करण्यासाठी आणखीन कोणा एका मंत्र्याचा राजीनामा घेणे भाजपला भाग आहे. लोकसभा निवडणुकीआधी तो निर्णय घ्यावा लागणार आहे.

मग नेत्यांच्या विधानाला अर्थ काय? : आमदार संकल्प आमोणकर यांनी तेलंगणा विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपसाठी घाम गाळून आणि दसरा महोत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात संचलन करून निष्ठा सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांचा विचार करणे भाजप नेतृत्वाला भाग आहे. तसे झाले तर मंत्रिमंडळ बदल होणार नाही, या म्हणण्याला किती किंमत राहते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कामत, लोबो अधांतरीच

आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ८ आमदारांचे नेतृत्व केले होते, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी उघडपणे सांगितले आहे. त्या दोघांना भाजप नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनांविषयी स्थानिक पातळीवर कोणतीच माहिती नाही, अशी भूमिका स्थानिक नेतृत्वाने वेळोवेळी घेतली आहे.

त्यामुळे या दोघांसाठी मंत्रिमंडळात बदल होणार नाहीत कशावरून, असा प्रश्न सत्ताधारी वर्तुळात आहे. तूर्त त्या प्रश्नाला उत्तर नसल्याने मंत्रिमंडळात आणखी बदल होणार नाहीत, एवढेच एक वाक्य सांगून विषयाला विराम देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT