पणजी : संसद अधिवेशनात काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी दाबोळी विमानतळाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आणि हे विमानतळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा दावा केल्यानंतर आता गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी, मंत्री माविन गुदिन्हो यांच्या एका पत्राचा आधार घेत राज्य सरकार याप्रकरणी लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.
मंत्री गुदिन्हो यांनी १० रोजी संरक्षणमंत्री सिंग यांना पत्र पाठवून दाबोळी विमानतळ सुरूच ठेवण्याची मागणी केली आहे. दाबोळी विमानतळाने गेल्या अनेक वर्षांत राज्यात येणारे पर्यटक आणि विमान कंपन्यांना आवश्यक त्या सर्व साधनसुविधा पुरवलेल्या आहेत. प्राधिकरणाने नेहमीच या विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
पायाभूत साधनसुविधांतही वाढ करण्यात येत असून, टर्मिनलचा १,२५६ कोटी खर्च करून विस्तार करण्याचेही नियोजन करण्यात आलेले आहे. याची दखल घेऊन हे विमानतळ सुरूच रहावे, अशी विनंती मंत्री गुदिन्हो यांनी सिंग यांना केली आहे. हे पत्र जनतेसमोर आणत, दाबोळी बंद करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, तर मंत्री गुदिन्होंना याबाबत राजनाथ सिंग यांना पत्र का लिहावे, असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
दाबोळी विमानतळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. हे विमानतळ यापुढेही सुरू राहील, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे सर्वच नेते देत आहेत. असे असतानाही मंत्री गुदिन्हो यांनी पत्राद्वारे केलेल्या विनंतीतून भाजप आणि मंत्री गुदिन्हो यांच्यात याप्रश्नी समन्वय नसल्याचे आणि या विषयावरून सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट होते, असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.